फाशी दिली जाऊ शकते, हे ठाऊक असतांनाही मी बांगलादेशात परत जाणार !

माजी पंतप्रधान शेख हसीना यांची मोठी घोषणा

शेख हसीना

नवी देहली – देशामध्ये परतल्यावर मला कारागृहात पाठवले जाऊ शकते आणि फाशीही दिली जाऊ शकते, याची मला पूर्ण कल्पना आहे; परंतु तरीही मी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पुन्हा एकदा केली. त्या एका मुलाखतीत बोलत होत्या.

शेख हसीना पुढे म्हणाल्या की, ‘वर्ष २०२४ मधील विद्यार्थी आंदोलनात  झालेल्या हिंसाचारशी माझा काहीही संबंध नाही. मला दोषी ठरवणे आणि फाशीची शिक्षा सुनावणे, या गोष्टी राजकारणाने प्रेरित आहेत.’ या आंदोलनामुळे शेख हसीना यांना देश सोडून पळून जावे लागले होते आणि त्यांना भारताने आश्रय दिला होता. तेव्हापासून त्या भारतात रहात आहेत.

बांगलादेशाच्या युद्ध गुन्हे न्यायाधिकरणाने नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांच्या अनुपस्थितीत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या वेळी बांगलादेशात महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरीम सरकार सत्तेत होते. बांगलादेशाने भारताला हसीना यांचे प्रत्यार्पण करण्याची विनंती केली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने नुकतेच सांगितले की, नवी देहलीला ही विनंती प्राप्त झाली असून कायदेशीर आणि न्यायिक प्रक्रिया लक्षात घेऊन याची पडताळणी केली जात आहे.