सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने सिंधु जल करारावरून पाकिस्तानला सुनावले

भारताचे राजदूत पी. हरीश

न्यूयॉर्क (अमेरिका) – सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला आहे, अशा शब्दांत भारताचे राजदूत पी. हरीश यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला सिंधु जल करारावरून सुनावले. परस्पर विश्वास आणि सदिच्छा यांविना सिंधु जल करारांतर्गत सहकार्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पी. हरीश पुढे म्हणाले की, पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्य व्यासपिठाचा वापर खोटा वृत्तांत पसरवण्यासाठी केला आहे. भारताची सिंधु जल करारावरील भूमिका स्पष्ट असून त्यात सातत्य आहे. सीमापार आतंकवादाचा राज्याच्या धोरणाचे साधन म्हणून वापर केला जात असतांना परस्पर विश्वास आणि सदिच्छा यांच्या आधारावर सहकार्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. पाकिस्तान या घटनात्म्क आणि कायदेशीर वास्तवाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.

मानवतेच्या आधारावर पाकिस्तानला पुराची चेतावणी देत राहू ! – भारत

आम्ही मानवतेच्या आधारावर पाकिस्तानला पुराची चेतावणी देत राहू, असे भारताने स्पष्ट केले. भारताच्या वाट्याच्या जलस्रोतांचा चांगला वापर करण्यासाठी भारताकडून जलविद्युत प्रकल्पांना गती देण्यात येईल.