भारताची सीमा उघडा, आम्हाला भारतात येऊ द्या ! – Bangladesh Hindus Appeal

बांगलादेशातील पीडित हिंदूंची भारतात प्रवेश देण्याची सरकारकडे विनंती

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील हिंदूंनी मुसलमानांच्या हिंसक जमावापासून स्वतःचे रक्षण होण्यासाठी भारताच्या सीमा उघडण्याची विनंती केली आहे. कट्टरतावादी ‘बागंलादेश नॅशनलिस्ट पार्टी’चे नेते तारिक रहमान हे १८ वर्षांनंतर पुन्हा बांगलादेशामध्ये परतल्यानंतर त्यांना जो पाठिंबा मिळाला, त्यामुळे अल्पसंख्यांकांमध्ये आणखी भीतीचे वातावरण आहे.

बांगलादेशातील विद्यार्थी नेता शरीफ ओस्मान हादी याचा मृत्यू झाल्यानंतर उसळलेला हिंसाचार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बांगलादेशातील हिंसक झालेल्या जमावाने दीपू चंद्र दास आणि अमृत मोंडल या दोन हिंदु तरुणांना ठार मारले. यासह ठिकठिकाणी जाळपोळ आणि मारहाण यांच्या असंख्य घटना घडत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्य प्रवक्ते रणधीर जयसवाल यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार बांगलादेशात हिंदू आणि अल्पसंख्यांक यांना लक्ष्य करण्याच्या २ सहस्र ९०० घटना मागच्या काळात घडल्या आहेत.

आम्ही अपमान गिळून जगत आहोत ! – बांगलादेशी हिंदू

रंगपूरमधील एका वृद्धाने सांगितले की, आमच्या धार्मिक श्रद्धेमुळे आम्हाला वारंवार अपमानास तोंड द्यावे लागत आहे. वारंवार हे घडूनही आम्ही त्यास उत्तर देऊ शकत नाही. रस्त्याने जातांना पूर्वी टोमणे ऐकावे लागत होते, आता त्याचे रूपांतर आक्रमणांमध्ये होत आहे. आम्ही इथे कचाट्यात सापडलो असून सुटकेचा कोणताच मार्ग दिसत नाही. दीपू चंद्र दास आणि अमृत मोंडल यांच्यासारखी परिस्थिती ओढवण्याची भीती असल्यामुळे आम्ही अपमान गिळून जगत आहोत.

बीएनपी अल्पसंख्यांकांच्या विरोधातला पक्ष !

या वृद्धाने पुढे सांगितले की, आम्ही आज असाहाय आहोत. भारतात पळून जावे, असे वाटते; पण तिथे सीमेवर कडक पहारा आहे. फेब्रुवारीमध्ये होणार्‍या निवडणुकांमध्ये बीएनपीच्या रहमान यांची सत्ता आल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते; कारण बीएनपी अल्पसंख्यांकांच्या (हिंदु, शीख, ख्रिस्ती आदींच्या) विरोधातला पक्ष मानला जातो.

ढाका येथील एका व्यक्तीने सांगितले की, दीपू चंद्र दास याच्या हत्येमुळे दहशत निर्माण झाली आहेच; पण त्यापुढे जाऊन जर माजी राष्ट्रपती खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान जर सत्तेवर आले, तर परिस्थिती आणखी चिंताग्रस्त होईल. बीएनपीची सत्ता आली, तर आम्हाला अधिक छळाला सामोरे जावे लागू शकते. शेख हसीना यांचा अवामी लीग पक्ष हा आमचा एकमेव तारणहार होता.

भारतातील हिंदु संघटना केवळ तोंड चालवण्यापलीकडे काहीही करत नाहीत ! – सनातन जागरण मंच

सनातन जागरण मंचाच्या एका कार्यकर्त्याने सांगितले की, बांगलादेशामध्ये २ कोटी ५० लाख हिंदू आहेत. ही संख्या छोटी नाही. भारतातील हिंदु संघटना केवळ तोंड चालवण्यापलीकडे काहीही करत नाहीत. आम्ही एका मोठ्या प्रलयाच्या तोंडाशी येऊन उभे आहोत.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंना येण्यासाठी सीमा उघडावी लागते, तर मुसलमान थेट घुसखोरी करून भारतात येतात आणि सुखनैव रहातात !
  • भारताची धर्माच्या आधारे फाळणी होऊन मुसलमानांसाठी पाकिस्तानची निर्मिती झाली आणि नंतर त्याचीही फाळणी होऊन बांगलादेश निर्माण झाला. त्याच वेळी लोकसंख्येची अदलाबदल करण्याची मागणी होती; मात्र गांधी, नेहरू आणि काँग्रेस यांनी ती फेटाळल्याने आजची स्थिती निर्माण झाली आहे. पाक आणि बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार होत आहे, तर भारतात मुसलमानांची लोकसंख्या प्रतिदिन वाढत आहे !