बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या प्रत्येक घटनेकडे भारत पहात आहे ! – Sheikh Hasina

बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे विधान

मोहम्मद युनुस व शेख हसीना

नवी देहली : शरीफ उस्मान हादी याच्या मृत्यूची घटना ही महंमद युनूस यांच्या राजवटीत आणखी बिकट झालेल्या अराजकतेचे प्रतिबिंब आहे. आता बांगलादेशात हिंसाचार हा एक सामान्य प्रकार बनला आहे. अंतरिम सरकार तो थांबवू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. अशा घटना बांगलादेशाला अंतर्गतदृष्ट्या अस्थिर करतात. आपल्या शेजारी देशांशी असलेल्या संबंधांवरही परिणाम करतात. ही सर्व परिस्थिती बांगलादेशाचे शेजारी असलेले देश पहात आहेत. बांगलादेशातील सध्याची अराजकतेची परिस्थिती आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचार, हिंदूंवरील अत्याचारांच्या घटना अशा प्रत्येक गोष्टीकडे भारत पहात आहे, असे विधान बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केले. शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतलेला आहे.

युनूस सरकारने आतंकवाद्यांना कारागृहातून सोडले !

शेख हसीना यांनी दावा केला की,

लाखो बांगलादेशी लोकांनाही, ज्यांना पूर्वी सुरक्षित आणि धर्मनिरपेक्ष राज्य आवडत होते, आता त्यांनाही चिंता वाटते. युनूस यांनी आतंकवादी वृत्तीच्या लोकांना मंत्रीमंडळात स्थान दिले. दोषी ठरलेल्या आतंकवाद्यांना कारागृहातून सोडले आणि आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटनांशी संबंधित गटांना सार्वजनिक जीवनात भूमिका बजावण्याची अनुमती दिली.

संपादकीय भूमिका

भारत सध्यातरी केवळ पहात आहे, असेच दिसत आहे. वास्तविक भारताने कृती करून तेथील हिंदूंचे रक्षण करणे आवश्यक आहे. भारताच्या ठिकाणी इस्रायल असता आणि हिंदूंच्या ठिकाणी ज्यू असते, तर चित्र वेगळे असते, हे कुणीही नाकारू शकणार नाही !