Madurai  Suicide :  मदुराई (तमिळनाडू) येथे हिंदु व्यक्तीने पोलीस ठाण्यात जाऊन केली आत्महत्या !

तमिळनाडूतील द्रमुक सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही थिरुपरंकुंद्रम् डोंगरावर दीपम् प्रज्वलित करण्यास अनुमती नाकारल्याने उचलले पाऊल

मदुराई (तमिळनाडू) – येथे ४० वर्षांच्या पूर्णा चंद्रन् नावाच्या व्यक्तीने प्रथम पेरियार यांच्या पुतळ्याजवळ स्वतःचे वाहन थांबवले त्यानंतर जवळच असलेल्या पोलीस ठाण्यात प्रवेश करून स्वतःला पेटवले. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर काही वेळातच पूर्णा चंद्रन यांची ध्वनीफिती सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली. ही ध्वनीफी त्यांची स्वतः मृत्यूपूर्वी ध्वनीमुद्रित केली होती. त्यामध्ये त्यांनी ‘थिरुपरंकुंद्रम् डोंगरावर दीपम् प्रज्वलित करण्यास अनुमती न मिळाल्याने मी अत्यंत व्यथित झालो आहे. मंदिराचे पावित्र्य भंग होऊ नये; म्हणून तेथे स्वतःला पेटवून न घेता शहरात जाऊन स्वतःला पेटवून घेण्याचा निर्णय घेत आहे’, असेही त्यांनी नमूद केले.

काय आहे प्रकरण ?

तमिळनाडूतील थिरुपरंकुंद्रम डोंगर भगवान मुरुगनांच्या ६ पवित्र स्थळांपैकी एक मानला जातो. येथे प्रतिवर्षी कार्तिकेय दीपम् प्रज्वलित करण्याच्या परंपरेवरून दीर्घकाळापासून वाद चालू आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने १ डिसेंबर २०२५ या दिवशी दीपस्तंभावर दीपम् प्रज्वलित करण्याचे निर्देश दिले होते; मात्र राज्य सरकारने कायदा सुव्यवस्था आणि परंपरा यांचा आधार घेत यास अनुमती दिली नाही. या डोंगरावर दर्गा असल्याने दीपम्ला विरोध केला जात आहे.

पूर्णा चंद्रन् नियमितपणे धार्मिक स्थळांना भेट देणारे होते. मंदिराची अपकीर्ती होऊ नये, अशी त्याची इच्छा होती. सरकारने न्यायालयाचा आदेश कार्यान्वित न केल्याने ते कोलमडले. कुटुंबियांना त्याच्या हेतूची कोणतीही कल्पना नव्हती. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि २ लहान मुले आहेत. ते वैद्यकीय प्रतिनिधी होते.

भाजपची द्रमुक सरकारवर टीका

या घटनेनंतर तमिळनाडू भाजपचे अध्यक्ष नैनार नागेंद्रन् आणि नेते के. अण्णामलाई यांनी यास द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ) सरकारच्या हिंदूविरोधी धोरणाचा परिणाम म्हटले; मात्र त्यांनी भाविकांना शांतता राखण्याचे आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवण्याचे आवाहनही केले.

संपादकीय भूमिका

  • ही आत्महत्या नसून द्रमुक सरकारने केलेली हत्याच आहे. यासाठी सरकारवर गुन्हा नोंद करून मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, यासाठी हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी दबाव निर्माण केला पाहिजे !
  • कोणत्याही घटनेत किंवा परिस्थितीत आत्महत्या करणे, ही अयोग्य कृती आहे. हिंदु धर्मशास्त्रानुसार आत्महत्या करणे चुकीचे आहे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याचे ते असे कृत्य करतात !