उद्योग हीच साधना !

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित लेखमाला !

‘भक्तीरसाने भारलेले वातावरण आणि आध्यात्मिक ऊर्जेचा अपार अनुभव मिळालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आपण सर्वांनीच १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत अनुभवला. ‘आपण सर्वांनी हा ३ दिवसांचा महोत्सव प्रत्यक्ष अनुभवला, त्यात सहभागी झालो आणि त्या दिव्य क्षणांचा भाग बनलो’, ही गोष्ट आयुष्यभरासाठी स्मरणात राहील. ‘न भूतो न भविष्यति ।’, असे वर्णन करावे, असा हा महोत्सव झाला. ‘हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी शंखनाद’ हा या महोत्सवामागचा मुख्य हेतू होता. या सोहळ्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८३ वा वाढदिवस अत्यंत भव्य पद्धतीने साजरा झाला. त्यासह सनातन संस्थेच्या २५ वर्षे पूर्ततेच्या परमोच्च क्षणाचेही आपण सर्व जण साक्षीदार ठरलो. याप्रसंगी आपण सर्वजण भक्तीभाव, आनंद आणि कृतज्ञता यांनी भारावून गेलो होतो. 

याच निमित्ताने माझ्या मनात विचार आले, ‘उद्योजकांचे स्वतःचे जीवन समृद्ध होईल, त्यांच्या व्यवसायाचा विस्तार होईल, तसेच देशाच्या सर्वांगीण विकासालाही हातभार लागेल. याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे. या अनुभवाची माहिती इतर उद्योजकांना मिळावी. याच अनुभवावर आधारित लेखमाला लिहावी’, अशी ही लेखमाला आजपासून चालू करत आहे.

लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि., ठाणे.

(भाग १)

उद्योगपतींना साधना सांगतांनाचे प्रातिनिधीक छायाचित्र

१. संत-महात्म्यांच्या आशीर्वादाने हिंदु राष्ट्र साकार होईल !

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला देश-विदेशातून अनुमाने ३० सहस्र साधक, हिंदुत्वनिष्ठ आणि कार्यकर्ते उपस्थित होते. काश्मीर विस्थापितांपासून कन्याकुमारीपर्यंत, तसेच मुंबईपासून कोलकातापर्यंत विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संस्था यांचे कार्यकर्ते या एका जागी जमले होते. देशाच्या विविध चळवळीत सहभागी झालेले कार्यकर्ते, हिंदु धर्मासाठी कार्य करणार्‍या संस्था यांचा या महोत्सवात सहभाग होता. सुमारे १५० हून अधिक संत, प्रतिष्ठित हे ३ दिवस चाललेल्या या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांच्या सान्निध्याने एक विलक्षण ऊर्जा पसरली होती. स्वामी विवेकानंद यांनी म्हटले होते, ‘मला १०० तरुण द्या, मी भारताचे चित्र पालटेन.’ त्याचप्रमाणे या संतसमुहाला पहातांना वाटले, ‘जर एवढ्या संत-महात्म्यांचे एकत्रित आशीर्वाद लाभले, तर हिंदु राष्ट्र नक्कीच साकार होईल.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘हिंदु राष्ट्राचे गतवैभव पुन्हा मिळवायचे असेल, तर ‘गुरुकृपायोगानुसार’ साधना करावी लागेल !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

२. हिंदु राष्ट्र स्थापनेचा आरंभ !

श्री. रवींद्र प्रभुदेसाई

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्ते गोमातेचे पवित्र चिन्ह असलेल्या सनातन धर्मच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले आणि त्याच वेळी शंखनाद करून हिंदु राष्ट्र स्थापनेचा आरंभ करण्यात आला.

३. प्रदर्शनातील विलक्षण अनुभव !

महोत्सवात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील विविध संतांच्या पादुकांचे दर्शन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची आठवण करून देणारे शस्त्रप्रदर्शन, ‘सनातन संस्थे’च्या उपक्रमांचे दर्शन, तसेच गोसंवर्धनाचे प्रकल्प हे सगळे अनुभव विलक्षण होते.

४. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त उत्तम व्यवस्था  

महोत्सवात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन झाल्यामुळे वातावरण अधिकच पवित्र झाले. जेव्हा जेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले व्यासपिठावर येत, तेव्हा आपोआपच संपूर्ण वातावरणात चैतन्य संचारत असे. संतांचे मार्गदर्शन, साधकांचे अनुभव, नेत्यांची भाषणे यांमधून उपस्थितांना अपार ज्ञानसंपदा मिळाली. भोजन आणि इतर सर्व व्यवस्था अत्यंत उत्तम प्रकारे करण्यात आली होती. शिस्तबद्ध, उत्साही आणि अत्यंत प्रभावी पद्धतीने या महोत्सवाचे आयोजन केले होते. गोव्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ यांच्या सहकार्यामुळे संपूर्ण कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला.

५. आद्यशंकराचार्यांनीच जन्म घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला पुन्हा आरंभ केल्याची भावना जागृत होणे ! 

‘हिंदु राष्ट्राचे गतवैभव पुन्हा मिळवायचे असेल, तर ‘गुरुकृपायोगानुसार’ साधना करावी लागेल’, असा मूलमंत्र सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना दिला आहे. ‘सनातन संस्थे’च्या स्थापनेपासून, म्हणजेच वर्ष १९९९ पासून वर्ष २०२५ पर्यंत त्यांनी हा मूलमंत्र सर्वांना शिस्तबद्ध रितीने शिकवला आणि त्याचे विराट स्वरूप ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले. यापूर्वी आद्यशंकराचार्यांनी सनातन विचारांचे तत्त्वज्ञान जगभर पोचवले, तसेच या महोत्सवानेही सनातन संस्कृतीची महती जनमानसात जागवली. ‘पुन्हा एकदा जणू आद्यशंकराचार्यांनीच जन्म घेतला आहे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला पुन्हा आरंभ झाला’, अशी भावना सर्वांच्याच मनात जागृत झाली.

६. भगवान श्रीकृष्णाने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रूपातून हिंदु राष्ट्र स्थापनेचे अशक्यप्राय कार्याविषयी विश्वास जागवणे !

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।। – भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक ७

अर्थ : जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते (म्हणजे लोक धर्माचरण करत नाहीत) आणि अधर्म बळावू लागतो, तेव्हा मी स्वतः प्रकट होतो.

या वचनाप्रमाणे ‘भगवान श्रीकृष्ण जणू सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रूपात आले आणि त्यांनी या महोत्सवातून लाखो हिंदूंना संघटित करून ‘हिंदु राष्ट्र स्थापनेचे अशक्यप्राय कार्य शक्य आहे’, असा विश्वास सर्वांच्या मनात जागवला.

 ७. सनातन संस्थेने अध्यात्माचे मूलभूत सिद्धांत सोप्या भाषेत उपलब्ध करून देणे 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्यात्माविषयी एक गहन सूत्र सांगितले, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’, हा अध्यात्माचा मूलभूत सिद्धांत आहे. प्रत्येक व्यक्तीचा परमेश्वरापर्यंत पोचण्याचा मार्ग वेगळा असू शकतो. जर पृथ्वीवर ८०० कोटी लोक असतील, तर ८०० कोटी साधनामार्ग परमेश्वरापर्यंत नेणारे असतील.’

आजवर आपल्याला अनेक चुकीच्या व्याख्या सांगितल्या गेल्या, ‘सनातन’ म्हणजे संकुचित, जुनी किंवा पुरातन विचारधारणा’; पण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी  स्पष्ट केलेली ‘सनातन’ शब्दाची व्याख्या महत्त्वपूर्ण आहे, ‘नित्य नूतन: इति सनातन: ।’, म्हणजे ज्याला प्रतिदिन नव्याने पालवी फुटते, जे सतत नवे ज्ञान देते, तेच खरे ‘सनातन’. जे यापूर्वी होते, आज आहे आणि यापुढेही अबाधित राहील. खरे सनातन, म्हणजे वेदांपासून आलेले अद्वितीय ज्ञान, जे काळानुसार संतांनी आपल्याला त्यांच्या भाषेत दिले. ‘विज्ञानाला जशी एक वैश्विक भाषा असते, तसेच धर्म आणि संस्कृती हे दोन्ही विज्ञानाच्या भाषेत समजावून सांगितले पाहिजे’, असा आग्रह गुरूंनी धरला. खरेतर अध्यात्म हेसुद्धा आत्मा आणि परमात्मा यांच्याविषयीचे शास्त्र आहे. यानुसार शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या ईश्वराच्या साधनेतून निरंतर आनंद मिळवणे प्रत्येकाला शक्य आहे. म्हणूनच ‘सनातन संस्थे’ने रामायण, महाभारत, भगवद्गीता आणि वेद यांचे सार लोकांपर्यंत पोचवले आहे. त्यातून सनातन संस्थेने निर्मिलेले ३६८ ग्रंथ सोप्या भाषेत आणि प्रत्यक्ष जीवनात कार्यवाहीत आणता येतील, अशा स्वरूपातील आहे.

८. अध्यात्माच्या भाषेत ‘नोकरी’ ही ‘व्यष्टी साधना’, तर ‘व्यवसाय’ ही ‘समष्टी साधना’ ! 

माझ्या मनात असा विचार आला, ‘उद्योजकतेसाठी या आध्यात्मिक ज्ञानाचा कसा उपयोग करता येईल ?’ अध्यात्माच्या भाषेत ‘नोकरी’ ही ‘व्यष्टी साधना’, तर ‘व्यवसाय’ ही ‘समष्टी साधना’ आहे; कारण नोकरी करणार्‍यांचे कार्य हे प्रामुख्याने स्वतःसह कुटुंबापुरतेच मर्यादित असते; मात्र व्यवसाय करणार्‍यांमुळे समाजाच्या विकासाला हातभार लागतो.

मग माझ्या मनात आले, ‘उद्योजक हेच खरे परिवर्तनाचे शिल्पकार होऊ शकतात; कारण ते समष्टी साधना करतात.’ जशी इंग्लंडमध्ये क्रांती झाली, तेव्हा राजेशाही बाजूला सारून उद्योजक आणि व्यापारी यांनी लोकशाहीची स्थापना घडवून आणली. उद्योजक हा खरेतर एका अर्थाने राजाच असतो; कारण त्याच्याकडे शेकडो, सहस्रो लोक रोजगारासाठी कार्यरत असतात. ‘राजा कालस्य कारणम् ।’, असे महाभारतात म्हटले आहे, म्हणजेच समाजाच्या घडणीत राजासारखीच भूमिका उद्योजक पार पाडू शकतात. उद्योजकांचा हा प्रभाव इतका व्यापक असतो की, त्यांच्याकडे २ सहस्र, ५ सहस्र, कधी एक लाखो लोक नोकरीसाठी जोडलेले असतात. ते लोकांना अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याची सवय लावतात. व्यवस्थापनाच्या (‘मॅनेजमेंट’च्या) विविध तत्त्वांचा ते काटेकोरपणे उपयोग करतात.

वाचकांना सूचना

या लेखाविषयी वाचकांनी अभिप्राय कळवण्यासाठी [email protected] या ई-मेलवर किंवा दू.क्र. (०२२) ६७०३५५५५ यावर संपर्क साधावा.

९. उद्योगाच्या वाढीमागे आध्यात्मिक तत्त्वे कारणीभूत आणि लेखमाला लिहिण्याची प्रेरणा !  

माझ्या मनात आले, ‘जर या व्यवस्थापनशास्त्रात आध्यात्मिक आधार मिळाला, तर त्याचा निश्चितच मोठा लाभ होईल. यामुळे उद्योजकांचे स्वतःचे जीवन समृद्ध होण्यासह त्यांच्या व्यवसायाचा विस्तार होईल आणि देशाच्या सर्वांगीण विकासालाही हातभार लागेल.’ याचा मला स्वतःलाही अनुभव आला आहे. पितांबरी उद्योगाच्या वाढीमागेही हीच आध्यात्मिक तत्त्वे कारणीभूत होती. ‘याची माहिती इतर उद्योजकांना मिळावी’, अशी माझी मनापासून इच्छा होती. ‘याच अनुभवावर आधारित लेखमाला लिहावी’, असा विचार मनात आला आणि सर्वांना उपयुक्त असे लेख लिहिण्यास प्रारंभ केला.

‘अध्यात्मशास्त्रात तत्त्वज्ञानाला २ टक्के आणि कृतीला ९८ टक्के महत्त्व आहे’; म्हणूनच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आशीर्वादानेच हा विचार कृतीत पालटून या लेखमालिकेतील हा पहिला लेख वाचकांसमोर मांडला आहे.

भाग २ : वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/963852.html

संपादकीय भूमिका

व्यवस्थापनशास्त्रात आध्यात्माचा समावेश केल्यास व्यावसायिक आणि उद्योजक यांच्यासह देशातील नागरिकांचे जीवन समृद्ध होईल !