Malegaon Blast : ‘हिंदु आतंकवाद’ ठरवण्यासाठी आय.एस्.आय.ने काँग्रेसला मोहरा बनवले !

  • मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेल्यांचा गौप्यस्फोट !

  • चीननेही केले साहाय्य !

  • कसाब जिवंत सापडल्याने २६/११ आक्रमणाचे खापर हिंदूंवर फोडण्याचा कट फसला !

(आय.एस्.आय. म्हणजे  इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा)

डावीकडून श्री. जगदीश म्हात्रे, श्री. सुधाकर चतुर्वेदी, मेजर रमेश उपाध्याय, श्री. श्याम साहू, श्री. समीर कुळकर्णी आणि श्री. राकेश धावडे

मुंबई, ७ ऑगस्ट (वार्ता.) – सिमीचे आतंकवादी बाँब बनवत असतांना मालेगाव येथे स्फोट झाला असल्याची शक्यता आहे. याविषयी अन्वेषण यंत्रणांनी चौकशी केल्यास सत्य पुढे येईल. ‘हिंदु आतंकवादा’चा कटही पाकिस्तानात शिजला. पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आय.एस्.आय.’ने यासाठी काँग्रेसला मोहरा बनवले. वर्ष २००९ च्या निवडणुकीत हिंदूंना आंतकवादी ठरवण्यासाठी हा कट करण्यात आला होता आणि यासाठी चीनकडूनही साहाय्य करण्यात आले होते, असा गंभीर आरोप मेजर रमेश उपाध्याय यांनी केला. ‘मालेगाव बाँबस्फोट २००८’च्या खटल्यातून निर्दोष मुक्त झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी ७ ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला. या वेळी सुधाकर चतुर्वेदी, राकेश धावडे, समीर कुलकर्णी, श्याम साहू आणि जगदीश म्हात्रे हे उपस्थित होते.

काँग्रेसचे नेते पाकिस्तानचे प्यादे असल्याप्रमाणे वक्तव्य करत आहेत !

मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त)

रमेश उपाध्याय पुढे म्हणाले की, २६ नोव्हेंबर २००८ या दिवशीचे (‘२६/११’चे) मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचे खापर हिंदूंवर फोडण्याचा पाकिस्तानचा कट होता. त्यासाठी आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांनी हातात भगवे दोरेही बांधले होते. ‘समीर चौधरी’ या बनावट नावाने कसाब मुंबईत वावरला; मात्र तो जिवंत सापडल्यामुळे हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा कट फसला. बाँब साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या दुचाकीमध्ये फुटल्याचा कोणताही पुरावा नाही. आम्ही मालेगाव येथे कधीही गेलो नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही काँग्रेसच्या नेत्यांनी पाकिस्तानची भाषा केली. काँग्रेसचे नेते पाकिस्तानचे प्यादे असल्याप्रमाणे वक्तव्य करत आहेत.

हिंदूंना आतंकवादी म्हणणार्‍या पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढच्या निवडणुकीत जिंकून दाखवावे ! – समीर कुळकर्णी

श्री. समीर कुळकर्णी

इंग्रजांनी भारतावर राज्य करूनही क्रांतीकारकांना आतंकवादी ठरवले नाही. काँग्रेसने मात्र सत्तेसाठी हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे गलिच्छ राजकारण केले. मालेगाव बाँबस्फोटाशी आमचा तीळमात्र संबंध नव्हता. आम्ही निर्दोष होतो. बहुसंख्य हिंदूंच्या मतांवर सत्ता भोगून हिंदूंना आतंकवादी म्हणतांना पृथ्वीराज चव्हाण यांना लाज वाटायला हवी. पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढच्या निवडणुकीत उभे राहून जिंकून दाखवावे.

मतांसाठी काँग्रेसने हिंदूंची आणि भगव्याची अपकीर्ती केली ! – श्याम साहू

मतांसाठी किती जणांना कारागृहात टाकले, किती जणांचे जीवन उद्ध्वस्त केले, याने काँग्रेसला फरक पडत नाही. मतांसाठी काँग्रेसने हिंदूंची आणि भगव्याची अपकीर्ती केली. हिंदूंच्या नेत्यांची अपकीर्ती करण्यासाठी काँग्रेसने त्यांनी नावे घेण्यासाठी आमच्यावर दबाव आणला, असा आरोप श्याम साहू यांनी केला.

काँग्रेस पक्ष बुडणार ! – सुधाकर चतुर्वेदी

श्री. सुधाकर चतुर्वेदी

श्री. सुधाकर चतुर्वेदी म्हणाले, ‘‘काँग्रेस पक्ष बुडणार आहे. त्यामुळे हिंदूंना आतंकवादी ठरवण्याची उठाठेव ते करत आहेत. यामुळे उरलीसुरली काँग्रेस संपणार आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या थोबाडीत मारा आणि माझ्याकडून २ लाख रुपये बक्षीस घ्या.’’

केवळ धावडे यांचा मित्र असल्याने मला अटक ! – जगदीश म्हात्रे

केवळ राकेश धावडे यांचा मित्र असल्यामुळे मला अटक करण्यात आली. मालेगाव स्फोटाशी माझा काहीही संबंध नव्हता; परंतु मला ५ वर्षे कारागृहात ठेवण्यात आले, अशी व्यथा श्री. जगदीश म्हात्रे यांनी या वेळी व्यक्त केली.

संपादकीय भूमिका

या आरोपांचे सखोल अन्वेषण करून सत्य देशासमोर आणणे आणि निरपराध हिंदुत्वनिष्ठांना न्याय देणे आवश्यक झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांनी याकडे गांभीर्याने पाहात चौकशीचा आदेश दिला पाहिजे !