Lt Colonel Prasad Purohit : शरद पवार यांनी ‘हिंदु आतंकवाद’ शब्द उच्चारल्यावर एका महिन्यात मालेगाव बाँबस्फोट झाला !

लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा न्यायालयातील लेखी जबाबातून गंभीर आरोप

मुंबई : वर्ष २००८ मध्ये एका वाहन फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्द उच्चारला होता. त्यानंतर लगेचच एका महिन्यात मालेगाव बाँबस्फोटाची घटना घडली. तेव्हा मध्यप्रदेशातील पंचमढी मुख्यालयात कर्नल श्रीवास्तव यांनी मला संपर्क करून बोलावून घेतले होते. तेथे माझा भ्रमणभाष काढून घेण्यात आला. मला भोपाळला नेण्यात आले. विमानतळावर गेल्यावर लक्षात आले की, माझे तिकीट देहलीऐवजी मुंबईचे आहे. भ्रमणभाषअभावी मी घरच्यांना याविषयी कळवू शकलो नाही. कर्नल श्रीवास्तव हे आतंकवादविरोधी पथकाच्या दलालाप्रमाणे (‘एजंट’प्रमाणे) काम करत होते.

लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित

मला चारचाकी वाहनात बळजोरीने बसवून खंडाळा येथील एका बंगल्यात नेण्यात आले. तेथे आधीपासूनच तत्कालीन पोलीस अधिकारी परमबीर सिंह आणि हेमंत करकरे उपस्थित होते. अशा प्रकारे माझ्या पाठीत खंजीर खुपसला गेला, असा गंभीर आरोप मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी केला. याविषयीचा उल्लेख त्यांनी न्यायालयात दिलेल्या जबाबात केला आहे.

शरद पवार यांनी उच्चारलेल्या ‘हिंदु आतंकवाद’ या शब्दाविषयी विचारल्यावर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ‘‘या गोष्टीला २० वर्षे उलटून गेली. मला हे आता आठवत नाही.’’ (राजकारण्यांना अशा अडचणीच्या गोष्टी आठवत नसतातच ! – संपादक)

परमबीर सिंह यांचा प्रतिक्रिया देण्यास नकार !

‘साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेले आरोपही गंभीर आहेत. त्यांना झालेल्या मारहाणीत तत्कालीन पोलीस अधिकारी हेमंत करकरे, परमबीर सिंह यांच्या नावांचा समावेश होता’, असे सांगत एका वृत्तवाहिनीने परमबीर सिंह यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आरोपात उल्लेख असलेले रमेश कुलकर्णी यांनी भ्रमणभाष उचलला नाही, तसेच सचिन कदम यांचा संपर्क होऊ शकला नाही.

शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मात्र ‘शरद पवार यांनी ‘हिंदु आतंकवाद’ शब्द वापरल्याचे आठवत नाही. याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये कुठेही आल्याचे वाचले नाही’, असे सांगितले. (धादांत खोटे बोलणार्‍या सुप्रिया सुळे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

आता यावरून ‘शरद पवार यांचा मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाशी संबंध नसेल कशावरून ?’, असा प्रश्‍न कुणाच्या मनात आल्यास चूक काय ? त्यामुळे आता सरकारने या दृष्टीनेही तपास करणे आवश्यक आहे, असेच जनतेला वाटते !