WCL 2025 : इंग्लंडमध्ये होणारा भारत-पाकिस्तान सामना अंतत: रहित !

  • जनतेने केलेल्या राष्ट्रव्यापी विरोधाचा परिणाम

  • क्रिकेटपटू शिखर धवन यांनी ११ मे २०२५ या दिवशीच न खेळण्याचा दिला होता निर्णय

नवी देहली – ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स’मध्ये (‘डब्ल्यू.सी.एल्.’मध्ये) आता भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होणार नाही. भारतीय खेळाडूंची नावे मागे घेतल्याने आता हा सामना रहित करण्यात आला आहे. ‘डब्ल्यू.सी.एल्.’ने २० जुलैच्या पहाटे या संदर्भात एक निवेदन देऊन हे स्पष्ट केले. याआधी क्रिकेटपटू शिखर धवन यांनीही ‘एक्स’वर एक पोस्ट करून याची माहिती दिली. धवन यांनी म्हटले की, त्यांनी ११ मे २०२५ या दिवशीच ‘डब्ल्यू.सी.एल्.’ला दूरभाष, तसेच व्हॉट्सअ‍ॅप संदेश यांद्वारे कळवले होते की, ते या सामन्यात भाग घेणार नाहीत. एकूणच जनतेचा वाढता रोष पहाता हा निर्णय घेतला गेल्याचे सांगितले जात आहे.

१. धवन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, ‘‘सध्याच्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव, तसेच भूराजकीय स्थिती पहाता मी यामध्ये खेळू इच्छित नाही. मी ११ मे या दिवशी जो निर्णय घेतला, त्यावरच आजही ठाम आहे. माझा देश माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि देशापेक्षा अधिक महत्त्वाचे काहीच नसते.’’ यासाठी त्यांनी एका इ-मेलचा ‘स्क्रीनशॉट’ही (संगणकीय प्रतही) जोडला आहे.

२. याआधी १९ जुलैच्या रात्री उशिरा सुरेश रैना, युवराज सिंह आणि हरभजन सिंह यांनीही स्पर्धेतून माघार घेतल्याची बातमी हाती आली होती. तथापि, शिखर धवन यांच्या पोस्टनंतर स्पष्टता आली.

३. भारत-पाकिस्तान सामन्यावरून सामाजिक माध्यमे, तसेच वृत्तवाहिन्या अशा सर्व स्तरांवरून भारतियांकडून संताप व्यक्त केला जात होता. अंतत: आयोजकांनी तो रहित करण्याचा निर्णय घेतला.

‘डब्ल्यू.सी.एल्.’ने दिले स्पष्टीकरण

(म्हणे) ‘भारत-पाक यांच्यात अन्य काही खेळ खेळले जात असल्याने क्रिकेट सामना आयोजित केला होता !’

‘डब्ल्यू.सी.एल्.’ ही संस्था विदेशी नाही. अभिनेते अजय देवगण आणि हर्षित तोमर हे त्याचे संस्थापक ! थोडक्यात वरिष्ठ क्रिकेटपटूंचे जागतिक स्तरावरील सर्व सामन्यांचे आयोजन करणारी ही संस्था भारतीय आहे. असे असतांना असा निर्णय घेतला जाणे, हे देशासाठी लांच्छनास्पद आहे. यावरून त्यांच्यावर कारवाई का होऊ नये ?

‘डब्ल्यू.सी.एल्.’ने भारत-पाक सामना रहित केल्याची घोषणा करतांना लिहिले की, मुळात उभय देशांमध्ये अन्य काही खेळ खेळले गेले. पाकिस्तानचा हॉकी संघ भारतात येणार असल्याचे समजले. तसेच नुकताच दोन्ही देशात व्हॉलीबॉलचा सामनाही झाला. (यामध्ये तथ्य असल्यास संबंधित खेळांच्या आयोजकांनाही समज दिली गेली पाहिजे ! – संपादक) त्यामुळे आम्ही क्रिकेट सामना आयोजित करण्याचा निर्णय घेतला, असे निलाजरे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

जे शिखर धवन यांना लक्षात येते, ते अन्य क्रिकेटपटूंना आधीच का लक्षात आले नाही ? ‘पैसा हा राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रकर्तव्य यांपुढे वरचढ आहे का ?, असे प्रश्‍न संवेदनशील जनतेकडून त्यांना विचारले जाऊ लागले, तर आश्‍चर्य वाटायला नको !


इंग्लंडमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज क्रिकेट सामना होणार !  (Jully 19, 2025)

पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणावरून भारतियांकडून केला जात आहे विरोध

नवी देहली – इंग्लंडमध्ये ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स लीग’ या क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राला १८ जुलैपासून प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेमध्ये भारत, पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांचे संघ सहभागी झाले आहेत. यात सर्व माजी क्रिकेटपटू खेळणार आहेत. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातही २० जुलैला सामना होणार आहे. त्यावरून भारतीय दर्शक संतप्त झाले आहे.

पहलगाम येथे २२ एप्रिल या दिवशी झालेल्या पाक पुरस्कृत आतंकवादी आक्रमणामुळे या सामन्याला विरोध केला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी भारत या स्पर्धेत सहभागी झाला होता आणि त्याने पाकला पराजित करून स्पर्धा जिंकली होती. (पाकसमवेत सर्व प्रकारचे खेळ खेळणे भारताकडून बंद केलेले असतांना भारत पाकसमवेत खेळतोच कसा ? – संपादक)

भारतीय खेळाडूंमधील देशभक्ती कुठे गेली ?

शिखर धवन, युवराज सिंह, सुरेश रैना, इरफान पठानसह अनेक नावाजलेले भारतीय खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. शाहीद आफ्रिदी, महंमद हफीज, शोएब मलिक सारख्या पाकिस्तानी खेळाडूंसमवेत ते खेळणार आहेत. या पाकिस्तानी खेळाडूंनी वेळोवेळी भारताच्या विरोधात गरळओक केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी शाहीद आफ्रिदी याने ‘पाकने भारताचा पराभव केला’, असे सांगत फेरी काढून उत्सवही साजरा केला होता. यामुळे भारतियांकडून या स्पर्धेवर टीका होत आहे. ‘भारतीय खेळाडूंमधील देशभक्ती कुठे आहे ?’, असे प्रश्‍न विचारले जात आहेत.

शिखर धवन

संपादकीय भूमिका

  • पाकच्या विरोधात भारतियांची भावना तीव्र असतांना भारतीय खेळाडू परदेशात जाऊन पाकिस्तानसमवेत खेळतातच कसे ? संतप्त भारतियांनी भारतीय खेळाडूंवर बहिष्कार घातला, तर आश्‍चर्य वाटू नये !
  • या स्पर्धेत सहभागी होण्याची अनुमती भारत सरकारने कशी दिली ?, असाही प्रश्‍न उपस्थित होतो !