‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !

१५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त २६ जुलैला विशेष कार्यक्रम

नाशिक – ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रमंत्राच्या निर्मितीला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक पर्वणीचे औचित्य साधून ‘समर्थ भारत मंच’च्या वतीने ‘वन्दे मातरम् १५० – एका राष्ट्रमंत्राची धगधगती गाथा’ या विशेष दृकश्राव्य आणि अभिवाचनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ जुलैला सायंकाळी ५.३० वाजता कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास, जुना गंगापूर नाका, नाशिक येथे कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून नाशिकमधील इतिहासप्रेमी, राष्ट्रभक्त आणि नागरिक यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक संदेश नारायणे आणि अंजली नारायणे यांनी केले आहे.

‘वन्दे मातरम्’ या गीताचा जन्म कसा झाला ? हा शब्द स्वातंत्र्यलढ्याचा रणगर्जना किंवा युद्धघोष कसा बनला ? हे गीत कुणी कुणी गायले आणि त्याचा प्रसार देशोदेशी कसा झाला?  जनमानसात आदराचे स्थान असूनही हे गीत भारताचे राष्ट्रगीत का बनू शकले नाही ? अशा अनेक ऐतिहासिक आणि उत्सुकता वाढवणार्‍या प्रश्नांची उत्तरे या कार्यक्रमातून उलगडणार आहेत.

या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात ‘वन्दे मातरम्’ची अत्यंत दुर्मिळ ध्वनीमुद्रणे, ध्वनीचित्रफीती आणि जुनी छायाचित्रे प्रेक्षकांना पहायला, तसेच ऐकायला मिळणार आहेत.‘वन्दे मातरम्’ चे गाढे अभ्यासक व संशोधक मिलिंद प्रभाकर सबनीस यांच्या प्रदीर्घ संशोधनातून आणि लेखणीतून हा अभिनव कार्यक्रम साकार झाला आहे.

अंजली आणि संदेश नारायणे स्थापित ‘समर्थ भारत मंच’ नाशिक यांच्या वतीने आयोजित आणि जन्मदा प्रतिष्ठान पुणे अन् ‘वन्दे मातरम्’ सार्ध शती जयंती समारोह समिती, पुणे यांच्या सहयोगाने ‘मल्हार प्रॉडक्शन’ प्रकाशित हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.