भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्‍या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन

मौलाना अन्सारीवर कठोर कारवाईची शिवसेनेची मागणी

आंदोलन करतांना शिवसैनिक

मिरज, २१ जुलै – विविध सामाजिक माध्यमांतून मौलाना जर्जिस अन्सारी याने ‘भगवान श्रीकृष्ण ५ वेळा नमाजपठण करत होते’, असा दावा केल्याचे समोर आले. या विधानाच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने महाराणा प्रताप चौक मिरज मार्केट येथे जर्जिस अन्सारी याच्या प्रतिमेस ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले.

या वेळी शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी म्हणाले की, भगवद्गीता हा हिंदु धर्माचा पवित्र ग्रंथ असून भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातील दहाव्या श्लोकात योग, ध्यान आणि मनाची एकाग्रता यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्या श्लोकात ‘नमाज’ किंवा इस्लामी प्रार्थनेचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे त्या श्लोकाचा विपर्यास करून भगवान श्रीकृष्णांविषयी करण्यात आलेले विधान हिंदु धर्मियांच्या भावना दुखावणारे आहे.

शिवसेनेच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे संबंधित व्हिडिओ आणि पोस्टची सखोल चौकशी करून, जाणूनबुजून धार्मिक भावना दुखावण्याचा अथवा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे आढळल्यास भारतीय न्याय संहितेतील लागू असलेल्या संबंधित प्रावधानांनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ? – संपादक)

या वेळी शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी, माजी शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे, मराठा महासंघाचे विकास (काका) देसाई, उपशहर प्रमुख प्रकाश अहिरे, उपशहर प्रमुख यश पाटील, सूर्यकांत शेंगणे, सुनील कांबळे, शाम भंडारे, भास्कर सातपुते, किरण मिसाळ, ओंकार भोसले, तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.