Somalians Get Life Imprisonment :  नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्‍या सोमालियाच्या ४४  नागरिकांना जन्मठेप !

नौदलाच्या धाडसी कारवाईमुळे आरोपी अटकेत

मुंबई – मुंबईच्या विशेष न्यायालयाने भारताच्या सागरी सुरक्षेप्रकरणी मोठा निर्णय घेतला आहे. नौका कह्यात घेणे, तसेच खलाशांना ओलीस ठेवणे आणि भारतीय नौदलावर आक्रमण करणे यांसारख्या गंभीर आरोपांच्या अंतर्गत सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुनावणीच्या वेळी सर्व ४४ आरोपींनी त्यांच्या गुन्ह्याची स्वीकृती दिली. न्यायालयाने निर्णय देतांना भारतीय नौदलाच्या धाडसी कारवाईचे आणि आंतरराष्ट्रीय समुद्री सुरक्षेसाठी दिलेल्या योगदानाचे विशेष कौतुक केले.

१. मार्च २०२४ मध्ये एडनच्या आखातात सोमालियाच्या ९ नागरिकांनी एका इराणी मासेमारी नौकेचे अपहरण केले होते. एके-४७ रायफल्स आणि हँड ग्रेनेडने सज्ज असलेल्या सोमालिया नागरिकांनी नौकेवरील कर्मचार्‍यांना ३ दिवस ओलीस ठेवले. भारतीय नौदलाची ‘आय.एन्.एस्. त्रिशूल’ आणि ‘आय.एन्.एस्. सुमेधा’ या युद्धनौका घटनास्थळी पोचल्यावर सोमालिया नागरिकांनी गोळीबार केला. त्यानंतर नौदलाने धाडसी कारवाई करून सर्वांना अटक केली.

२. डिसेंबर २०२३ मध्ये माल्टाच्या ‘एम्.व्ही. रुएन्’ या व्यापारी नौकेचे अपहरण करण्यात आले होते. आय.एन्.एस्. कोलकाताने कारवाई करत ३५ सोमालिया नागरिकांना पकडले. या सर्वांवर खटला चालवण्यात आला.

आरोपींच्या कृत्यांमुळे त्यांच्यावर दयामाया दाखवण्यास न्यायालयाचा नकार !

४४ आरोपींनी न्यायालयाकडे गरिबी आणि कुटुंबियांचे दायित्व यांचा दाखला देत शिक्षेत सवलत देण्याची विनंती केली; मात्र न्यायालयाने स्पष्ट केले की, आर्थिक परिस्थिती काहीही असली, तरी शस्त्रांच्या जोरावर नौकांवर नियंत्रण मिळवणे, खलाशांना ओलीस ठेवणे आणि खंडणीसाठी त्यांचा वापर करणे, हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे अशा कृत्यांमध्ये दयामाया दाखवता येणार नाही. न्यायालयाच्या या निर्णयाचे समुद्रातील खलाशांनी स्वागत केले.

संपादकीय भूमिका

मुंबईच्या विशेष न्यायालयाचा स्तुत्य निर्णय !