TTP In Bangladesh : ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’चा बांगलादेशात शिरकाव !

भारतासाठी धोक्याची घटना

ढाका (बांगलादेश) – पाकिस्तानमध्ये कारवाया करणारी आतंकवादी संघटना ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) आता बांगलादेशाच्या माध्यमातून भारतात कारवाया करण्याच्या सिद्धतेत आहे. बांगलादेशाच्या आतंकवादविरोधी यंत्रणांनी या महिन्यात वेगवेगळ्या कारवाईत टीटीपीशी संबंध असल्याच्या संशयावरून २ जणांना अटक केली आहे. टीटीपी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमेवर सक्रीय आहे; परंतु आता ती बांगलादेशात पाय पसरवू लागली आहे.

१. बांगलादेशातील २ तरुणांनी टीटीपीचे प्रशिक्षण घेतले. त्यांपैकी एकाचा वझिरीस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. जुलैमध्ये ढाका येथील आतंकवादविरोधी पथकाने टीटीपीशी संबंध असल्याच्या आरोपाखाली शमीन महफुज आणि महंमद फैसल या दोघांना अटक केली.

२. ढाका येथील ‘द डेली स्टार’ वृत्तपत्राने वृत्त दिले आहे की, बांगलादेशी सुरक्षा संस्था या आव्हानाला तोंड देण्यासाठी गुप्तचर यंत्रणांकडून मिळणार्‍या माहितीच्या आधारावर कारवाई करत आहे; पण ती पुरेशी आहे का?, हा प्रश्न आता भारतासाठी महत्त्वाचा बनला आहे.

३.  बांगलादेशाची भारताशी ४ सहस्र किलोमीटरपेक्षा अधिक सीमा आहे. येथे कोणत्याही आतंकवादी संघटनेची उपस्थिती, ही भारताच्या सीमा आणि सुरक्षा यांना थेट आव्हान आहे. विशेषतः टीटीपी सारख्या संघटना, ज्या पाकिस्तानमध्ये सैन्य आणि पोलीस यांच्यावर आत्मघाती आक्रमणांसाठी कुप्रसिद्ध आहेत, त्यांची वाढती उपस्थिती भारतासाठी त्रासदायक ठरू शकते.

नेपाळनेही पाकिस्तानला ‘प्रादेशिक धोका’ म्हटले !

काही आठवड्यांपूर्वी नेपाळची राजधानी काठमांडू येथे झालेल्या एका मोठ्या चर्चासत्रात पाकपुरस्कृत आतंकवाद हा दक्षिण आशियातील शांततेसाठी मोठा धोका असल्याचे वर्णन करण्यात आले होते. भारतात दहशत पसरवण्यासाठी नेपाळचा वापर केला जातो, असे मानले जात होते. नेपाळचे माजी संरक्षणमंत्री मिनेंद्र रिजाल ते माजी परराष्ट्रमंत्री एन्.पी. सौद यांच्यापर्यंत सर्वांनी मान्य केले की, पाकिस्तानच्या आतंकवादी धोरणामुळे दक्षिण आशियातील देशांची संघटना बंद पडली. नेपाळचे माजी राजदूत मधु रमण आचार्य यांनी भारत आणि नेपाळ यांनी सीमेवर संयुक्त गस्त घालण्याची आवश्यकता प्रतिपादित करत ‘आतंकवादाविरुद्ध आम्ही भारतासमवेत आहोत’, असे स्पष्ट केले.

संपादकीय भूमिका

‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’चे भारतावर आक्रमण करण्याचे धाडस होणार नाही, असा वचक भारताने आताच या संघटनेवर बसवणे आवश्यक !