Pakistan Defence Minister’s Claim :(म्हणे) ‘आम्ही भारताची ५ लढाऊ विमाने पाडली, याचे पुरावे सामाजिक माध्यमांवर उपलब्ध !’ – पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ

  • पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा !

  • सी.एन्.एन्.च्या पत्रकाराने असिफ यांना फटकारले !

पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ व सी.एन्.एन्.च्या पत्रकार

नवी देहली – पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकच्या संसदेत भारताची ५ लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला होता. त्यानंतर पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सीएन्एन् (केबल न्यूज नेटवर्क) या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीतही हाच दावा केल्यावर मुलाखत घेणार्‍या पत्रकाराने याचा पुरावा विचारला. यावर ख्वाजा आसिफ यांनी ‘सामाजिक माध्यमांत प्रसारित होत आहे. भारतीय सामाजिक माध्यमांतही प्रसारित होत असून विमानांचा ढिगारा त्यांच्या परिसरात पडला आहे’, असे विधान केले. त्यावर पत्रकाराने ‘क्षमा करा; पण आम्ही तुम्हाला सामाजिक माध्यमांवरील मजकुराविषयी बोलण्यास सांगितले नाही’, अशा शब्दांत आसिफ यांना फटकारले.

चिनी उपकरणांचा वापर केला का?

‘भारताचे विमान पाडण्यासाठी चिनी उपकरणांचा वापर केला का ?’, असा प्रश्न आसिफ यांना विचारला असता ते म्हणाले की, नाही. चिनी उपकरण नाही. आमच्याकडे ‘जेएफ्-१७’ आणि ‘जेएफ्-१०’, ही चिनी विमाने आहेत; पण ती आता पाकिस्तानमध्ये निर्माण केली जात आहेत. जर भारत फ्रान्सकडून विमाने खरेदी करू शकतो आणि त्यांचा वापर करू शकतो, तर आम्ही चीन, रशिया, अमेरिका  किंवा ब्रिटनकडून विमाने खरेदी करू शकतो आणि त्यांचा वापर करू शकतो.

पाक भारताच्या सैनिकी तळांवरच आक्रमण करील !

आम्ही भारतातील केवळ सैनिकी प्रतिष्ठानांवर आक्रमण करू, नागरी वस्त्यांवर नाही. युद्ध झाल्यास पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करेल, असे आसिफ यांनी सांगितले. (पाक आणि कायद्यांचे पालन, हा विरोधाभास आहे. पाक कायद्याचे पालन करत असता, तर आज त्याची स्थिती ‘भीक मागणारा देश’, अशी झाली नसती ! – संपादक)

भारताने चीन सरकारला फटकारले !

पाकिस्तानने भारतीय वायूदलाची विमाने पाडल्याचे वृत्त चीनमधील भारतीय दूतावासाने फेटाळून लावले आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने या संदर्भात वृत्त प्रसारित केले होते. त्यावरून भारतीय दूतावासाने म्हटले की, अशा चुकीच्या माहितीची तपासणी केली पाहिजे आणि ती पसरवण्यापूर्वी त्याचे स्रोत तपासले पाहिजेत.

  • पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे हास्यास्पद विधान !

  • (म्हणे) ‘भारताला रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजावी लागेल !’  

पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर  टीव्हीवरून जनतेला संबोधित केले. ते म्हणाले की, आम्ही आमच्या देशाच्या रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू. पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर दिले आणि काही घंट्यांतच  भारताला मागे ढकलले. (खोटे बोल; पण रेटून बोल, याचे हे उत्तम उदाहरण होय ! – संपादक) भारताला रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत चुकवावी लागेल. आम्ही कठोर प्रत्युत्तर देऊ शकतो, हे आम्ही सिद्ध केले आहे.

पाककडून गाझाची छायाचित्रे दाखवून दिशाभूल !

पाकिस्तानच्या सामाजिक माध्यमांत गाझामधील विध्वंसाची छायाचित्रे प्रसारित करून भारताने पाकमधील निष्पाप नागरिक आणि मुले यांना लक्ष्य केल्याचे सांगितले जात आहे. तसेच भारताची तुलना इस्रायलशी केली जात आहे.

आतंकवाद्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पाकच्या पाकचे पंतप्रधान आणि सैन्यदल प्रमुख उपस्थित !

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे आतंकवाद्यांची ठिकाणे नष्ट करण्यात आली. यात १०० हून अधिक आतंकवादी ठार झाले. यात घायाळ झालेल्यांची विचारपूस करण्यासाठी पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर रुग्णालयात गेल्याचे दृश्य जगाने पाहिलेच होते. त्यानंतर भारताच्या कारवाईत ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि असीम मुनीर, तसेच अन्य सैन्याधिकारी प्रार्थना करत असल्याची छायाचित्रे प्रसारित झाली आहेत.

संपादकीय भूमिका

यावरून ‘पाकच्या आतंकवाद्यांना पाक सरकार आणि सैन्य यांचे पूर्ण समर्थन आहे’, हे स्पष्ट होते. संयुक्त राष्ट्रे आणि अन्य जागतिक समुदाय यांनी हे लक्षात घेऊन आता पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित केले पाहिजे !

(म्हणे) ‘पाकवरील आक्रमणाचा सूड उगवू !’ – अल्-कायदा

आतंकवादी संघटना अल्-कायदाची भारतीय उपखंडातील शाखा असलेल्या ‘अल्-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट’ने भारतावर इस्लामविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप करत म्हटले की, प्रत्येक अत्याचाराचा सूड उगवेपर्यंत आम्ही लढू, आम्ही अल्लाचे आहोत आणि अल्लाची शपथ घेतो. (ज्या संघटनेचे अस्तित्व संपुष्टात येत आहे,  ती संघटना म्हणजे सूड उगवणार. स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी अशा प्रकारची विधाने ही संघटना करत आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

पाकच्या संरक्षणमंत्र्यांच्या या विधानावरून त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच ! असे पाकिस्तानी म्हणे ‘गझवा-ए-हिंद’ (भारताचे इस्लामीकरण) करणार !