धर्माच्या ठिकाणी अशी ज्याची श्रद्धा आहे, त्याला सद्गती मिळेल !

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

ब्रह्मीभूत स्वामी वरदानंद भारती

 प्रश्न : धर्मरत: किं लभते ?

अर्थ : धर्माच्या ठिकाणी ज्याची श्रद्धा आहे, त्याला काय मिळते ?

उत्तर : धर्मरत: गतिं लभते ।

अर्थ : धर्मरताला सद्गती मिळते.

‘धर्मरत हा शब्द महत्त्वाचा आहे. रत म्हणजे रममाण होणारा, आवडीने, श्रद्धेने, न कंटाळता आणि न उबगता स्वीकारणारा. ‘धर्माच्या ठिकाणी अशी ज्याची श्रद्धा आहे, त्याला सद्गती मिळेल, तो उद्धरून जाईल’, हे खरेच आहे. मुख्य अडचण श्रद्धेचीच असते. ती ज्याच्याजवळ नाही, तो माणूस मग धार्मिक कृत्ये करतांना थातूरमातूरपणे तरी करतो किंवा काही तरी फुसके निमित्त सांगून ती कामे करायची टाळतो. अशी तोंडदेखलेपणाने केलेली कृत्ये मग कामी येत नाहीत.

धर्मकृत्यांविषयी खरोखरच श्रद्धा असेल, तर ती करण्याचा कधी क्षीण येत नाही. उलट ती करण्यात उत्साह आणि उल्हास वाटतो.’

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)

(साभार : ‘यक्षप्रश्न’ या ग्रंथातून)