काँग्रेस सत्ताधारी राहिली, तर या देशाला आग लागल्याखेरीज रहाणार नाही !

एकट्या जवाहरलाल नेहरूलाच बुद्धी दिली आहे, असेही नाही. जवाहरलालपेक्षा बुद्धीमान अनेक आहेत. मी ५ वर्षे कॅबिनेटमध्ये (मंत्रीमंडळामध्ये) होतो. ५ वर्षांचा मला अनुभव आहे. ८ दिवसांतून एकवेळ मी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित रहात असे. जवाहरलाल चांगले तोलून पाहिले आहेत. त्याचे डोके केवळ पोकळ भोपळ्याप्रमाणे आहे. त्यापलीकडे काही नाही. जवाहरलालचे नाक सरळ आहे. रंग गोरागोमटा आहे. म्हणून त्यास महत्त्व येत असेल, तर गोष्ट वेगळी; पण अशी व्यक्ती शारदा नाटकात म्हटल्याप्रमाणे ‘पाहिजे मुलीला सुंदर नवरा’, यादृष्टीने उत्तम ठरेल; पण नेता बुद्धीमान पाहिजे, कणखर पाहिजे, तो देशाचे कार्य करणारा हवा असेल, तर असे अनेक लोक सापडतील; पण तुम्हाला मात्र तोच पाहिजे ना ! विषयांतर झाले आणि काहींना ते अरूचकर वाटले, तर त्यांनी क्षमा करावी. तुम्ही कदाचित् मला मते देणार नाही; पण त्याची मला फिकीर नाही. मी चांगले ओळखतो की, या देशाच्या जातीगत राजनीतीमध्ये आम्हाला कोणतेही स्थान नाही. राजकीय जीवन व्यतित करता येत नाही, अशी स्थिती आहे. जीवनातील ५ वर्षे मी केंद्रीय मंत्रीमंडळात काढली आणि १० वर्षे केंद्रीय विधी मंत्रीमंडळात सदस्य म्हणून राहिलेलो आहे. आता मला पहाण्यासारखे काही बाकी राहिले नाही. पूर्ण समाधान झाले आहे. राष्ट्राची हानी होऊ नये, यासाठी हे सारे मी करतो. आज काँग्रेस सत्ताधारी आहे. ती तशीच पुढे सत्ताधारी राहिली, तर या देशाला आग लागल्याखेरीज रहाणार नाही.

(डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसविषयी वर्ष १९५६ मध्ये केलेले भाकीत आजही तितकेच खरे आहे. आताही ज्या राज्यांमध्ये काँग्रेस आहे, त्या त्या भागात लांगूलचालन, देश आणि हिंदुविरोधी कारवाया होत आहेत. एवढेच नव्हे, तर काँग्रेसने उपभोगलेल्या सत्ताकाळात केलेले भ्रष्टाचार आणि देशविरोधी कारवाया यांचा भांडाफोड आता होत आहे. त्यामुळे देशविघातक अशा काँग्रेसला जनतेनेच आता कायमचे घरी बसवायला हवे ! – संपादक)

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(साभार : ‘प्रबुद्ध भारत-आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांक’, २७ ऑक्टोबर १९५६)