भारताचे तत्‍कालीन २ पंतप्रधान आणि एक राजदूत यांच्‍यामुळे भारताचे शेकडो गुप्‍तचर पाक आणि इराण येथे मारले गेले !

‘इंडिया टीव्‍ही’वरील कार्यक्रमात पत्रकार, निवृत्त सैन्‍याधिकारी आणि तज्ञ यांचा गंभीर आरोप !

प्रतिकात्मक चित्र

नवी देहली – भारताचे २ पंतप्रधान आणि एक उपराष्‍ट्रपती यांनी त्‍यांच्‍या कार्यकाळाच्‍या वेळी पाकिस्‍तानला भारताची गुप्‍तचर यंत्रणा ‘रॉ’च्‍या पाक आणि इराण या देशांमध्‍ये असलेल्‍या हस्‍तकांची नावे या देशांना पुरवल्‍याने या हस्‍तकांची तेथे हत्‍या करण्‍यात आली, असा दावा इंडिया टीव्‍ही या हिंदी वृत्तवाहिनीवरील ‘कॉफी पर कुरुक्षेत्र’ या कार्यक्रमात मेजर गौरव आर्य (निवृत्त), पत्रकार प्रदीप सिंह आणि परराष्‍ट्र धोरणांचे तज्ञ वैभव सिंह यांनी बोलतांना केला.

या चर्चेत या तिघांनी माहिती देतांना दावा केला की,

१. माजी उपराष्‍ट्रपती हमीद अन्‍सारी आणि माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल या दोघांनी इराण आणि पाकिस्‍तान येथे कार्यरत असलेल्‍या भारतीय गुप्‍तचरांची नावे आणि पत्ते यांसह संपूर्ण माहिती त्‍या देशांना दिली होती, परिणामी ते सर्व गुप्‍तचर मारले गेले. भारतीय गुप्‍तचर यंत्रणा अद्याप या धक्‍क्‍यांतून पूर्णपणे सावरलेल्‍या नाहीत.

२. गुजराल पंतप्रधान असतांना त्‍यांनी पाकिस्‍तानला पत्र लिहून तेथील भारतीय गुप्‍तचरांनी नावे आणि पत्ते पाकिस्‍तानला दिले. त्‍यामुळे ते सर्व मारले गेले.

३. हमीद अन्‍सारी यांनी इराणचे राजदूत असतांना तेथील भारतीय हस्‍तकांची माहिती इराणला दिली होती. त्‍यामुळे ते सर्व गुप्‍तचर मारले गेले.

४. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी पाकिस्‍तानच्‍या अणूकार्यक्रमाबद्दल भारतीय गुप्‍तचरांनी मोठ्या कष्‍टाने गोळा केलेली संवेदनशील माहिती पाकिस्‍तानच्‍या राज्‍यकर्त्‍यांना सांगितली होती. त्‍याचा परिणाम असा झाला की, पाकिस्‍तानात कार्यरत असलेले भारताचे हस्‍तक पाकने ठार केले. जर असे झाले नसते, तर पाकिस्‍तान अणूबाँब बनवू शकला नसता.

५. याखेरीज वर्ष २००९ मध्‍ये इजिप्‍तमधील शर्म अल शेख शहरात तत्‍कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी ‘भारत पाकिस्‍तानच्‍या बलुचिस्‍तानमध्‍ये हस्‍तक्षेप करत आहे’, अशी स्‍वीकृती दिली होती. त्‍यामुळेच पाकिस्‍तानने नंतर म्‍हटले होते, ‘तुम्‍ही (भारत) आमच्‍यावर काश्‍मीरमध्‍ये अशांततेचा आरोप करता आणि बलुचिस्‍तानमध्‍ये तुम्‍ही तेच करता.’ स्‍वातंत्र्यानंतर यापेक्षा मोठी चूक कदाचित् दुसरी कोणतीच झाली नसेल.

संपादकीय भूमिका

हा आरोप यापूर्वीही वेगवेगळ्‍या व्‍यक्‍तींकडून करण्‍यात आला होता. याची नोंद घेऊन सरकारने सर्व पुरावे जनतेसमोर आणावेत. सरकारने या तिघांना देशद्रोही घोषित करून इतिहासात तशी नोंदही करावी, जेणेकरून पुढील पिढ्यांना याची माहिती मिळेल अन्‍यथा देश अशांना मोठेच समजत राहील !