Indira Gandhi Jayanti : राजस्‍थानात शाळांमध्‍ये इंदिरा गांधी जयंती साजरी करण्‍यावर बंदी !

शिक्षणमंत्री मदन दिलावर आणि इंदिरा गांधी(उजवीकडे )

जयपूर – राजस्‍थानच्‍या शिक्षण विभागाने राज्‍यातील शाळांमध्‍ये इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्‍यावर बंदी घातली आहे. यासह सरकारने शाळेच्‍या ‘कॅलेंडर’मधून इंदिरा गांधी जयंतीची नोंद हटवण्‍यात आली आहे. एवढेच नाही, तर इंदिरा गांधी यांच्‍या पुण्‍यतिथीनिमित्त आयोजित ‘क्‍वामी एकता सप्‍ताहा’चे नाव पालटून ‘समरसता सप्‍ताह’ असे करण्‍यात आले आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री मदन दिलावर(Madan Dilawar) यांनी दिली. या निर्णयामागे देशातील अनेक महापुरुषांचाही सन्‍मान करण्‍याचा उद्देश आहे, असे मदन दिलावर यांनी सांगितले.

शिक्षणमंत्री पुढे म्‍हणाले की, इंदिरा(Indira Gandhi) गांधी यांनी देशात आणीबाणी(Emergency) लागू केली होती. आणीबाणीमुळे देशातील लोकशाहीवर खोलवर जखमा झाल्‍या. वीर सावरकरांविषयी बोलतांना ते म्‍हणाले की, ते खरे देशभक्‍त आणि स्‍वातंत्र्यलढ्यातील सैनिक होते. वीर सावरकरांची जयंती साजरी करण्‍याचे शिक्षण विभागाने मान्‍य केले आहे.

संपादकीय भूमिका

काँग्रेसने तिच्‍या ६ दशकातील सत्ताकाळात देशातील जनतेसाठीच्‍या अनेक योजना, सुविधा आदींना गांधी-नेहरू घराण्‍यातील लोकांचीच नावे दिली आहेत. देशहिताच्‍या दृष्‍टीने गांधी-नेहरू घराण्‍यातील लोकांचे काय योगदान होते ?, हा एका वेगळ्‍या संशोधनाचा विषय ठरेल. तथापि काँग्रेसने लोकशाहीपेक्षा नेहमी गांधी-नेहरू घराण्‍याला उच्‍च स्‍थान दिले, हेच यावरून दिसून येते !