लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी तात्काळ ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करा ! 

यशश्री शिंदे हिच्या हत्येविरोधात दादर (मुंबई) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एकमुखी मागणी !

आंदोलनात सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ

मुंबई, ३० जुलै (वार्ता.) – महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ चालू केली; मात्र सद्य:स्थितीत हिंदु युवती आणि महिला ‘लव्ह जिहाद’च्या धोक्यामुळे असुरक्षित आहेत. त्यांच्या निर्घृण हत्या होत आहेत. त्यामुळे प्रथम बहिणींना सुरक्षा द्या. यासाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करा, अशी एकमुखी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली. यशश्री शिंदे हिच्या निर्घृण हत्येच्या विरोधात ३० जुलै या दिवशी दादर (पूर्व) रेल्वेस्थानकावर हिंदु राष्ट्र समन्वय समितीद्वारे करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात यशश्री शिंदे हिची हत्या करणार्‍या दाऊद शेख या जिहाद्याला भर चौकात फाशी देण्याची मागणीही करण्यात आली. प्रबोधनपर फलक धरून आंदोलकांनी घोषणा दिल्या.

मनसे, भाजप, आंतरराष्ट्रीय बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, वज्र दल, मानव सेवा प्रतिष्ठान, श्रीराम मित्रमंडळ (धारावी) आदी विविध राजकीय पक्ष आणि संघटना यांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी भाजपच्या महिला आघाडी विधानसभा उपाध्यक्षा सौ. रंजना वैती, अधिवक्ता उमेश पाटील, माहिती अधिकार कार्यकर्त्या सौ. स्वाती पाटील (चेंबूर), हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक हे सहभागी झाले होते. या आंदोलनात मुंबईतील विविध भागांतील युवती आणि महिला सहभागी झाल्या होत्या.

कायदा आणण्यासाठीच्या मागणीच्या निवेदनावर नागरिकांच्या स्वाक्षर्‍या !

राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्यासाठीच्या मागणीच्या निवेदनावर नागरिकांनी स्वाक्षर्‍या केल्या. हे निवेदन हिंदु राष्ट्र समन्वय समितीद्वारे हे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.

‘लव्ह जिहाद’ म्हणून तक्रारी प्रविष्ट कराव्यात ! – कु. लक्ष्मी कनोजिया, राष्ट्रीय अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय बजरंग दल

राज्यात दिवसेंदिवस महिला-मुलींवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारच्या धर्तीवर ‘अँटी रोमियो स्कॉड’सारखी पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी. मुसलमान युवक आणि हिंदु युवती यांच्या प्रेमप्रकरणांच्या तक्रारी ‘लव्ह जिहाद’ म्हणून प्रविष्ट केल्या जाव्यात, तसेच या प्रकरणांत काही धर्मांध आणि कट्टरतावादी जिहादी संघटना, जिहादी नेते, तसेच परकीय शक्ती आढळून आल्यास त्यांची पाळेमुळे खणून काढून त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी.

महाराष्ट्रातील युवती गायब होण्यामागे ‘लव्ह जिहाद’ आहे का ? याची चौकशी व्हावी ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था

महाराष्ट्रातून वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांच्या कालावधीत १ लाख युवती महाराष्ट्रातून गायब असल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने महिला आणि मुली बेपत्ता आहेत, यामागे लव्ह जिहाद आहे का ? याची सरकारने चौकशी करावी.