३० जूननंतरही टँकर चालू ठेवण्याच्या प्रशासनाला सूचना ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

अजित पवार

मुंबई, ५ जुलै (वार्ता.) – पाऊस न पडल्याने राज्याच्या ज्या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, तिथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. राज्यातील एकाही तालुक्यात किंवा खेड्यात कुणीही पाण्यापासून वंचित रहाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये पाऊस पडून पाणी उपलब्ध होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना मुख्य सचिव आणि सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ४ जुलै या दिवशी विधानसभेत केली.

सदस्य राजेश टोपे आणि जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या सूत्रांवर उत्तर देतांना उपमुख्यमंत्री म्हणाले की, जूनमध्ये पाऊस पडतो. त्यामुळे ३० जूनपर्यंत टँकर चालू ठेवण्यात येतात; परंतु अद्यापही काही भागांत पाऊस पडलेला नाही. तिथे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा तालुक्यांत किंवा गावांत ३० जूननंतरही टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात येतील.