श्री जगन्नाथ मंदिराची अद्भुत आणि बुद्धीअगम्य वैशिष्ट्ये !

७ जुलै या दिवशी पुरी (ओडिशा) येथे जगन्नाथ रथयात्रा आहे. त्यानिमित्ताने…

पुरी (ओडिशा) येथे ७ जुलैपासून जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ होत आहे. ही यात्रा म्हणजे भगवान श्री जगन्नाथाच्या अर्थात् जगदोद्धारक भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांसाठी जणू महापर्वणीच ! पुरी हे कलियुगातील चार धाममधील एक आहे. केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील भाविकांची रीघ असलेली ही यात्रा श्रद्धा आणि भक्ती यांचे उत्कट दर्शन घडवते.

ही जगातील सर्वांत मोठी यात्रा आहे. लाखो विष्णुभक्त या ठिकाणी एकत्र येतात. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे अन्य बहुतांश मंदिरात श्रीकृष्ण पत्नीसमवेत विराजमान असतात; पण या मंदिरात मात्र ते भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्यासह विराजमान आहेत. पुरी ही विष्णुभूमी आहे.

१ . अन्य अनेक बुद्धीअगम्य वैशिष्ट्यांसह प्रकर्षाने लक्षात येणारी गोष्ट म्हणजे मंदिराच्या सिंहद्वारातून आत प्रवेश करताच समुद्राचा आवाज येणे पूर्णपणे बंद होते; मात्र संपूर्ण पुरी शहरामध्ये अन्य कुठेही गेले, तरी समुद्राचा आवाज येतच असतो.

२ . अनुमाने ८०० वर्षे प्राचीन असलेल्या या मंदिराचे वास्तुकौशल्य इतके भव्य आहे की, त्याविषयी संशोधन करण्यासाठी जगभरातून वास्तूतज्ञ या मंदिराला भेट देतात.

३ . हे तीर्थक्षेत्र भारताच्या ४ पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.

४ . श्री जगन्नाथाच्या मंदिराची उंची २१४ फूट इतकी आहे. मंदिराचे क्षेत्रफळ ४ लाख वर्गफुटात पसरलेले आहे.

५ . पुरी येथील कोणत्याही ठिकाणावरून मंदिराच्या कळसावर असलेले सुदर्शन चक्र पाहिल्यास ते आपल्यासमोरच असल्याचे जाणवते.

६ . मंदिरावर असलेला झेंडा नेहमीच हवेच्या विरुद्ध दिशेने फडकतो. (प्रत्येक सूत्राचा बुद्धीच्या स्तरावर कीस पाडणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना हे मंदिर म्हणजे एक चपराकच आहे ! यातून हिंदु धर्माचे अद्वितीय महत्त्व लक्षात येते ! – संपादक) प्रतिदिन सायंकाळी मंदिरावरील झेंडा पालटण्यात येतो.

७ . सामान्यत: प्रतिदिन हवा समुद्राकडून भूमीच्या दिशेने येते आणि सायंकाळी त्याच्याविरुद्ध जाते; परंतु पुरी येथे त्याच्या उलट प्रक्रिया घडते.

८ . मुख्य घुमटाची सावली दिवसाच्या कोणत्याही वेळी अदृश्यच असते.

९ . येथे पक्षी किंवा विमाने मंदिरावरून उडतांना कधीही दिसणार नाहीत.

१० . भोजनासाठी मंदिरात वर्षभर पुरेल इतकी अन्नसामुग्री असते. विशेष म्हणजे महाप्रसाद जराही वाया जात नाही.

११ . या मंदिरातील स्वयंपाकघर हे जगातील कुठल्या मंदिरात असणार्‍या स्वयंपाकघरापेक्षा सर्वांत मोठे आहे. येथे महाप्रसाद करतांना मातीची भांडी एकावर एक ठेवली जातात. सर्व अन्न लाकडाद्वारे प्रज्वलित केलेल्या अग्नीवरच शिजवले जाते.

१२ . या विशाल स्वयंपाकघरामध्ये भगवान जगन्नाथाला आवडणारा महाप्रसाद बनवण्यात येतो. यासाठी ५०० स्वयंपाकी आणि त्यांचे ३०० साहाय्यक एकाच वेळी सेवा करतात.