Devgiri Fort : पूजाबंदीचा निर्णय मागे न घेतल्यास हिंदुत्वनिष्ठ मंदिरात जाऊन सामूहिक पूजा करतील !

  • पूजाबंदीच्या निर्णयाचा गोव्यात चालू असलेल्या ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त निषेध

  • रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचीही चेतावणी

देवगिरी गडावरील भारतमातेची मूर्ती

फोंडा (गोवा) – देशातील भारतमातेचे एकमेव मंदिर असलेल्या मंदिरात पुरातत्व विभागाने पूजेस बंदी घातली आहे. पुरातत्त्व विभागाच्या तुघलकी फतव्याचा ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त एकमुखाने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला, तसेच पूर्वीप्रमाणे सदर पूजा चालू करण्यास तातडीने अनुमती देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

ठराव मंजूर करतांना व्यासपिठावर डावीकडून पू. पवन सिन्हा गुरुजी, अधिवक्ता दिलीप देशमुख, श्री. गुरुप्रसाद गौडा आणि बोलतांना श्री. सुनील घनवट

या वेळी ‘हर हर महादेव’च्या जयघोषात सदर ठराव संमत करण्यात आला.

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक –

श्री. सुनील घनवट

याविषयी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले की, पूर्वीप्रमाणे पूजा चालू करण्यास तात्काळ अनुमती न दिल्यास शिवप्रेमी, दुर्गप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ देवगिरीतील भारतमाता मंदिरात जाऊन सामूहिक पूजा करतील आणि तेथे कायदा अन् सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याचे दायित्व पूर्णतः पोलीस अन् प्रशासन यांचे असेल. अशा प्रकारे पूजा बंद करून सर्व हिंदु गडप्रेमी आणि शिवप्रेमी यांच्या असंतोषास कारणीभूत ठरू नये, अन्यथा हे सर्व जण रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याविना रहाणार नाहीत.

या पत्रकात पुढे नमूद करण्यात आले आहे की, वास्तविक पहाता विभागाच्या नियमानुसार एखाद्या पुरातत्व वास्तूमध्ये पूर्वापार एखादी धार्मिक कृती होत असेल, तर ती बंद करता येणार नाही. ताजमहालमध्ये प्रत्येक शुक्रवारी मुसलमान नमाजपठण करतात. काशी विश्‍वनाथ मंदिर पाडून बांधलेल्या ज्ञानवापीमध्ये नमाजपठण केले जाते, तसेच मध्यप्रदेशातील भोज शाळेतील कमाल मौलाना मशिदीमध्ये नमाजपठण केले जात आहे. जर वर्ष १९४८ पासून भारतमाता मंदिरात होणार्‍या पूजेवर बंदी घातली जात असेल, तर ताजमहल, ज्ञानवापी आणि धार येथील कमाल मौलाना मशिदीतील नमाजपठण बंद करून दाखवावे, असे आव्हान  ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या माध्यमांतून केंद्रीय पुरातत्व विभागाला देण्यात आले आहे. खरे तर भारतमातेची पूजा बंद करून पुरातत्व विभागाने भारताशी द्रोह केला आहे. केंद्र सरकारने अशा लोकांवर कठोर कारवाई करून देशवासियांमध्ये चांगला संदेश द्यावा, अशी मागणीही श्री. सुनील घनवट यांनी या वेळी केली.