संपादकीय :आंतरराष्ट्रीय हिंदु विरोध !

विदेशी प्रसारमाध्यमांनी लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याविषयी वर्णनात्मक बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने लिहिले आहे, ‘मतदानाची प्रारंभीची आकडेवारी पंतप्रधान मोदी यांच्या हिंदु राष्ट्रवादी पक्षाला कमकुवत पाठिंबा दर्शवते’, तर ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याभोवतीचे अजिंक्यतेचे आभाळ तुटले आहे’, असे भाष्य केले आहे. अयोध्येत भाजपचा पराभव झाल्याविषयीही अनेक वर्तमानपत्रांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. यांपैकी काही वर्तमानपत्रांनी जेव्हा अयोध्येत भव्य श्रीराममंदिराच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता, तेव्हा जाणीवपूर्वक हिंदू आणि भारत देश यांच्या विषयी लिहितांना, ‘ते (भाजप) मुसलमानांचा द्वेष करतात, मुसलमानांची छळवणूक करून हे मंदिर उभारले जात आहे’, अशा स्वरूपाची वृत्ते दिली होती. यातून या विदेशी प्रसारमाध्यमांचा हिंदुद्वेष आणि भारतद्वेष स्पष्टपणे लक्षात येतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्यांना अन्य घटक पक्षांच्या साहाय्याने बहुमताचा आकडा गाठावा लागत आहे, हे खरे असले, तरी त्याचा  हिंदु राष्ट्रवादाशी ओढूनताणून संबंध का जोडण्यात येत आहे ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप पक्ष हिंदुत्वनिष्ठ म्हणून देशात आणि विदेशात प्रसिद्ध आहे. या पक्षाचे नेते आणि देशाच्या सर्वाेच्च पदावरील नेते नरेंद्र मोदी हे हिंदु धर्मीय आहेत आणि ते राष्ट्रहितैषी योजना राबवून भारताचा आशिया खंडात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण करत आहेत, ही विदेशींची मुख्य अडचण आहे. जगात १५० हून अधिक ख्रिस्ती देश, ५० हून अधिक मुसलमान देश आहेत. हिंदूंचा देश म्हणवला जाणारा नेपाळ साम्यवाद्यांच्या प्रभावाखाली निधर्मी बनला आहे. असे असल्यामुळे जगातील हिंदूंना भारताकडून अपेक्षा आहेत, तर अन्य धर्मीयांना भारताची (म्हणजे त्यांच्या लेखी हिंदूंची) प्रगती खुपते आहे. भारतात नरेंद्र मोदी सरकारने ३७० कलम हटवणे, ‘तीन तलाक’विरोधी कायदा, नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करणे इत्यादी अनेक राष्ट्रहितैषी निर्णय घेतले आहेत. ५०० वर्षे प्रलंबित श्रीराममंदिराचा प्रश्न सोडवून मंदिर याच सरकारच्या कार्यकाळात दिमाखात उभारले गेले आहे. काशी, मथुरा, भोजशाळा असे हिंदूंच्या मानबिंदूशी संबंधित आणि इस्लामी आक्रमणाशी संबंधित अनेक प्रश्नांची न्यायालयात सुनावणी चालू आहे. इस्लामी आक्रमकांनी पाडलेल्या हिंदु मंदिरांच्या पुनर्उभारणीची मागणी ठिकठिकाणी होत आहे. भारताच्या शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमांवरील साम्यवादी मळभ दूर करून भारत अन् हिंदु संस्कृती यांना पूरक पालट करण्यात येत आहेत. नरेंद्र मोदी त्यांच्या तिसर्‍या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या सिद्धतेत आहेत. ज्यामध्ये समान नागरी कायद्याचा प्रामुख्याने समावेश आहे. विदेश मंत्रालय आणि सैन्य यांच्याकडून पाकव्याप्त काश्मीरला भारताचा भाग बनवण्याच्या गर्जना काही दिवसाआड करण्यात येत आहेत. या सर्व उत्साहाचा परिणाम म्हणा किंवा ते न पहावून म्हणा विदेशी प्रसारमाध्यमे त्यातही अमेरिका, ब्रिटन आणि आखाती देशातील ‘अल्-जजिरा’ सारखी माध्यमे त्यांच्या भारतविरोधी धोरणाला अनुसरून सातत्याने भारतविरोधी बातम्या प्रसिद्ध करत आहेत.

भारतविरोधी अपप्रचार

निवडणुकांच्या पूर्वी तर अमेरिकेतील माध्यमांनी भारतातील अल्पसंख्यांकांविषयी तथाकथित चिंता व्यक्त केली होती. अल्पसंख्यांक ज्यामध्ये विशेषत: मुसलमानांची स्थिती, त्यांच्यावर होणारे अन्याय, पिळवणूक यांचाच उल्लेख केला जात होता. ‘भारतात मुसलमानांमध्ये भयाचे वातावरण आहे’, अशा खोट्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या. प्रत्यक्षात येथील वस्तूस्थिती पूर्णपणे भिन्न आहे, हे पत्रकारांना कळत नाही, असे नाही; मात्र भारताला कोंडीत पकडण्यासाठीच्या, भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नांचा तो भाग आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. भारताच्या निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी जॉर्ज सोरोस यांसारखे विदेशी धनाढ्य, काही विदेशी संस्था सातत्याने पैसे आणि माणसे पेरून कार्यरत असतात, असे आरोप अनेक वेळा झाले आहेत. हा सरळसरळ लोकशाहीप्रधान आणि सार्वभौम भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेपच आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सातत्याने ‘भारतातील निवडणुकांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत’, अशी विधाने केली होती. भारतात रस घेण्याचे त्यांचे कारण एकमेव म्हणजे कसेही करून भारतविरोधी म्हणजेच बहुसंख्य हिंदुविरोधी वातावरण निर्माण करणे. यात काही प्रमाणात ते यशस्वी झाले; कारण ‘भारतातील निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी अनेक हात प्रयत्नशील होते’, असे अनेक जाणकार सांगत आहेत.

आपल्याकडे राज्यघटना पालटण्याचे सूत्र विरोधकांकडून सातत्याने उपस्थित केले जाते. राज्यघटना पालटणे म्हणजे त्यांना दुसर्‍या शब्दांत त्यांच्या दृष्टीनेही निधर्मी भारतात हिंदु राष्ट्र निर्माण करण्याचे प्रयत्न असा अर्थ होऊ शकतो. हिंदु राष्ट्राला विरोध करणे म्हणजे थेट हिंदूंना विरोध करण्यासारखे आहे म्हणून सोयीचा शब्द म्हणून विरोधक ‘राज्यघटना पालटणे’ असा शब्दप्रयोग वापरत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप आणि त्याच्या मित्र पक्षांच्या विरुद्ध प्रचार करतांना ‘नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यावर राज्यघटना पालटतील’ म्हणजेच दुसर्‍या शब्दांत हिंदु राष्ट्र आणतील, याची भीती निर्माण करण्यात आली. हीच भीती बाळगून देशात या वेळी मोठ्या संख्येत अल्पसंख्यांकांनी मतदान केले आणि अनेक भागांत विद्यमान भाजप खासदार पराभूत होऊन त्या जागी काँग्रेस, समाजवादी पक्ष इत्यादींचे उमेदवार निवडून आले. भाजपच्या प्रारंभीच्या निष्कर्षांमध्ये त्यांच्या विरोधात विरोधकांनी केलेला भयंकर दुष्प्रचार हेच एक महत्त्वाचे कारण सांगण्यात आले. म्हणजे यामध्ये एक मोठे ‘टूलकीट’ कार्यरत होते कि काय, असे म्हणण्यास वाव आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमे, भारतविरोधी संस्था, संघटना, अल्पसंख्यांकांच्या संस्था, संघटना, भारतातील काँग्रेससारखे हिंदुविरोधी पक्ष या सर्वांच्या विरोधात एक समानता दिसते. नरेंद्र मोदी केवळ एक दिसणारे माध्यम आहे; म्हणून त्यांच्या विरोधात प्रचार करण्यात आला असला, तरी तो हिंदूंविरोधी आहे, हे अत्यंत महत्त्वाचे सूत्र आहे. हिंदु राष्ट्राचे नावही न घेता, कार्यरत असणार्‍यांवर एवढी सडकून टीका केली जाते, विरोध केला जातो, तर हिंदु राष्ट्र हेच सूत्र घेतल्यास किती विरोध होईल ? याची कल्पना करता येणार नाही. तरी कितीही विरोध असला, तरी हिंदुत्वनिष्ठ, राष्ट्रप्रेमी हे या विश्वकल्याण करणार्‍या हिंदु राष्ट्राची चातकासारखी वाट पहात आहेत आणि प्रयत्नशीलही आहेत. कुणी कितीही विरोध केला, आकाशपाताळ एक केले, तरी हिंदु राष्ट्र या हिंदु भूमीत स्थापन होणार आहे, ही काळ्या दगडावरील रेघ आहे, हे निश्चित !