पालखीच्या पुणे मुक्कामात पोलिसांकडून अडवणूक झाल्यास पालखी दर्शनासाठी रस्त्यावरच ठेवू !

संत तुकाराम महाराज सोहळ्याचे सोहळाप्रमुख ह.भ.प. माणिक महाराज मोरे यांची भूमिका !

देहू (जिल्हा पुणे) – आषाढी वारीसाठी ‘संत तुकाराम महाराज पालखी सोहळा’ देहूतून पंढरपूरकडे २८ जूनला प्रस्थान ठेवणार आहे. पुण्यात नाना पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिरात पालखी सोहळा २ दिवस मुक्कामी असतो. या काळात संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने काही भाविकांना दर्शनासाठी पास दिले जातात; मात्र पास दाखवूनही पोलीस दर्शनासाठी सोडत नाहीत. (अडवणूक करणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? – संपादक) तसेच संस्थानचे पदाधिकारी, सेवेकरी यांनाही प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे पास असणार्‍यांना पोलिसांनी अडवू नये. अन्यथा सोहळा भाविकांच्या दर्शनासाठी मंदिरात ठेवण्याऐवजी रस्त्यावरच ठेवू, अशी भूमिका संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. माणिक महाराज मोरे यांनी घेतली आहे. हवेलीचे प्रांताधिकारी संजय अस्वले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संतोष महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, पिंपरी-चिंचवडचे अपर तहसीलदार जयराज देशमुख, तलाठी संजय काळे आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढावी, पालखी मार्गावरील खड्डे बुजवावेत यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या.

संपादकीय भूमिका

अन्य धर्मियांच्या नव्हे, तर केवळ हिंदूंच्याच धार्मिक गोष्टींत आडकाठी आणणारे पोलीस दुटप्पीच !