दक्षिण कन्नड (कर्नाटक) जिल्ह्यातील गोवंश वर्ष २००७ ते २०१९ या कालावधीत ४० टक्क्यांपेक्षा अधिक नष्ट झाला !

मंगळुरू (कर्नाटक)- दक्षिण कन्नड जिल्ह्यातील गोवंश वर्ष २००७ ते २०१९ या कालावधीत ४० टक्क्यांपेक्षा अधिक नष्ट झाला आहे. पशूपालन, तसेच पशूवैद्यकीय सेवा विभागाकडून प्रत्येक ५ वर्षांतून एकदा पशूगणती करतो. त्यांच्या गणतीनुसार दक्षिण कन्नड जिल्ह्यात वर्ष २००७ मध्वा असलेल्या गोवंशांची संख्या वर्ष २०१९ मध्ये ४० टक्के घसरली आहे. वर्ष २०१९ पासून आतापर्यंत ही संख्या आणखीन घसरली असण्याची शक्यता अधिकारी व्यक्त करत आहेत.

गोवंश किती होता आणि किती झाला ?

१. वर्ष २००७ च्या पशूगणतीनुसार जिल्ह्यातील देशी आणि संकरित (जर्सी) गोवंश ४ लाख ११ सहस्र ७२८ इतका होता. वर्ष २०१२ मध्ये ही संख्या २ लाख ५७ सहस्र ४१५ इतकी झाली. २०१९ मध्ये ही संख्या २ लाख ५२ सहस्र ४०१ इतकी खाली घसरली आहे. यावर्षी नवीन गणती होणार असून सध्याची स्थिती अजून समजायची आहे.

२. वर्ष २००७ मध्ये देशी गायी २ लाख २९ सहस्र ८३८ इतक्या होत्या. वर्ष २०१२ मध्ये त्या १ लाख १३ सहस्र ७४७ इतक्या झाल्या. वर्ष २०१९ मध्ये त्या ६५ सहस्र ९९७ इतक्याच राहिल्या. आताची संख्या आणखी अल्प झाली असणार.

३. देशी गायींची संख्या अल्प होत असतांना दुसरीकडे संकरित गायींची संख्या वाढली आहे. वर्ष २००७ मध्ये संकरित गायी १ लाख ६६ सहस्र ७७१ इतक्या होत्या. वर्ष २०१९ मध्ये त्यात वाढ होऊन त्या १ लाख ८४ सहस्र ५७२ इतक्या झाल्या.

४. वर्ष २००७ मध्ये म्हशींची संख्या १५ सहस्र ११९, वर्ष २०१२ मध्ये ३ सहस्र ७०० आणि वर्ष २०१९ मध्ये १ सहस्र ८३२ इतकी होती.

युवकांमध्ये गोपालनाची आवड नाही !

जिल्हा पशूपालन विभागाचे उपनिर्देशक डॉ. अरुण कुमार शेट्टी म्हणाले की, गोवंश शीघ्रतेने नष्ट होत असल्याचे कारण म्हणजे मागील पिढीतील लोक गोपालन करत होते; मात्र आताच्या युवा पिढीला पशूपालनाची आवड नाही. कर्मचार्‍यांचाही तुटवडा आहे.   गावात पशूपालन लाभदायक नाही, तसेच पशूपालनासाठी मोठ्या जागेची कमतरता यांमुळे स्थानिक गोपालकांची संख्या न्यून होत आहे.

संपादकीय भूमिका

एका जिल्ह्यात ही स्थिती आहे, तर संपूर्ण देशात काय स्थिती असेल, याची कल्पना येते ! याकडे सर्वपक्षीय सरकारांनी गांभिर्याने विचार करून गोवंश वाचवण्यासाठी आणि जगवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात गोवंश केवळ चित्रातच पहायला मिळेल !