CNN Writes Islamophobia In India : पंतप्रधान मोदी यांच्या भाजपने धर्मनिरपेक्ष भारताला ‘हिंदु राष्ट्रा’मध्ये परावर्तित केले ! – सी.एन्.एन्.

  • अमेरिकी प्रसारमाध्यम ‘सी.एन्.एन्.’कडून दिशाभूल करणारा लेख प्रकाशित !

  • मोदी यांच्या मतदारसंघात (वाराणसीत) हिंदु राष्ट्रवादाच्या उदयामुळे तेथील मुसलमानांमध्ये भीती पसरल्याचाही लेखातून आरोप !

नवी देहली – भारतातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमे भारतीय मतदारांना पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला विरोध करण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे गुंतली आहेत. पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांमध्ये सातत्याने असे लेख प्रसिद्ध होत आहेत, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदु कट्टरतावादी आहेत आणि त्यांच्या तिसर्‍या कार्यकाळामुळे भारत ‘हिंदु राष्ट्र’ होईल, असा दावा केला जात आहे. भारतविरोधी आणि हिंदुविरोधी प्रचार करण्यासाठी ही प्रसारमाध्यमे सतत खोटे बोलत आहेत. अमेरिकेतील प्रसारमाध्यम ‘सी.एन्.एन्.’ने ‘पंतप्रधान मोदी यांच्या भाजपने धर्मनिरपेक्ष भारताला ‘हिंदु राष्ट्रा’मध्ये परावर्तित केले’, असा आरोप करणारा असाच एक लेख प्रकाशित केला आहे.

१ मे २०२४ या दिवशी ‘Rising Hindu Nationalism leaves Muslim fearful in Indias holy city’ (हिंदु राष्ट्रवादाचा उदयामुळे भारताच्या पवित्र शहरातील (वाराणसीतील) मुसलमानांमध्ये भय !) या शीर्षकाखाली हा लेख प्रकाशित केला आहे. या लेखाद्वारे वाराणसीमधील मुसलमानांना पंतप्रधान मोदी येथून तिसर्‍यांदा निवडणूक जिंकल्यावर भीती वाटत असल्याचे शीर्षकातूनच दिसून येते.

(म्हणे) ‘मुसलमानांना लक्ष्य करण्यासाठी हिंदूंना उच्च पदांवर बसवले जात आहे !’

ऐश्‍वर्या एस्. अय्यर, रिया मोगल, कुणाल सेहगल आणि विल रिप्लेे यांनी लिहिलेला हा लेख, ‘पंतप्रधान मोदी यांच्या भारतात सरकारी संस्थांमध्ये उच्च पदांवर हिंदु  राष्ट्रवादी कशा प्रकारे नियुक्त केले जात आहेत’, या सूत्राला धरून आहे. यात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आला नसला, तरी मुसलमानांना लक्ष्य करण्यासाठी हिंदूंना मोठ्या पदांवर नियुक्त केले जात असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.

(म्हणे) ‘ज्ञानवापीवरील हिंदूंचा दावा पुराव्यांवर आधारित नाही !’

ज्ञानवापीवरील हिंदूंचा दावा लोकांच्या विश्‍वासावर आधारित आहे आणि वास्तविक पुराव्यावर नाही, असे या लेखात म्हटले आहे. यात एका मुसलमानाचे म्हणणे देण्यात आले आहे. तो म्हणतो की, त्याचा आता न्यायव्यवस्था आणि पोलिसांवर विश्‍वास राहिलेला नाही. अयोध्येतील श्रीराममंदिराविषयी लेखात म्हटले आहे की, श्रीराममंदिराच्या उभारणीमुळे देशाच्या धर्मनिरपेक्षतेची हानी झाली आहे.

कलम ३७० आणि नागरिकत्व सुधारणा कायदा यांचा उल्लेख !

सी.एन्.एन्.च्या लेखात जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याविषयीही चर्चा करण्यात आली आहे. मोदी सरकारने भारतातील एकमेव मुसलमानबहुल राज्याची स्वायत्तता हिरावून घेतली, असा दावा यात करण्यात आला आहे; मात्र त्याच वेळी तेथील जिहादी आतंकवाद, तसेच सरकारने केलेला विकास याविषयी काहीच उल्लेख करण्यात आलेला नाही. नागरिकत्व सुधारणा कायद्याचाही यात उल्लेख केला आहे. हा कायदा मुसलमानविरोधी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘हा कायदा मुसलमानांना नागरिकत्वापासून वगळतो’, असे यात म्हटले आहे.

वर्ष २०२० च्या देहलीतील हिंदुविरोधी दंगलीचाही यात उल्लेख आहे; मात्र त्याला मुसलमानविरोधी दंगल म्हटले आहे. यात हिंदूंकडून नासीर अली याच्या डोळ्यात गोळी झाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच वेळी गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येविषयी या लेखात कोणताच उल्लेख नाही.

संपादकीय भूमिका

  • भारत लवकरच हिंदु राष्ट्र होणार आहे, ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे कुणी कितीही हिंदुद्वेषी असले आणि त्यांनी या विरोधात कितीही गरळओक केली, तरी त्याचा कोणताही परिणाम यावर होणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे !
  • इस्लामी देशांत हिंदूंची जी स्थिती आहे, त्याविषयी, तसेच बंगाल आणि केरळ या राज्यांमध्ये हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांविषयी ‘सी.एन्.एन्.’ कधीही तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !
  • भारतीय प्रसारमाध्यमांनीही आता ‘अमेरिकेचे सरकार कशा प्रकारे तेथील हिंदूंच्या हत्या, कृष्णवर्णियांच्या हत्या आदींसाठी उत्तरदायी आहे’, यावर प्रकाश टाकणारे लेख लिहिले पाहिजेत आणि त्यांचा आधार घेत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला सातत्याने जाब विचारला पाहिजे !