महामार्गांवरील फलकांवर ‘अहिल्यानगर’ आणि ‘छत्रपती संभाजीनगर’ नावे त्वरित लावावीत !

हिंदु जनजागृती समितीची अहिल्यानगर येथे निवेदनाद्वारे मागणी !

निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना निवेदन देतांना (डावीकडून) सर्वश्री बापू ठाणगे, रामेश्वर भुकन, संजय जोशी

अहिल्यानगर – ‘अहमदनगर’चे ‘अहिल्यानगर’ आणि ‘औरंगाबाद’चे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामकरण होऊन बराच कालावधी लोटला; मात्र विविध राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील दिशादर्शक फलकांवर अजूनही जुन्याच नावांचा उल्लेख आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होतो. अधिकृत शासकीय निर्णयाची प्रभावी कार्यवाही झालेली दिसत नाही. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर येथे जाणार्‍या सर्व महामार्गांवरील दिशादर्शक अन् अंतर दर्शवणारे फलक, तसेच शहरांच्या हद्दीतील जुने फलक पालटून नव्या नावांचे फलक तातडीने लावावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना देण्यात आले. ‘प्रशासनाने येत्या ७ दिवसांत कार्यवाही चालू न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल’, अशी चेतावणीही निवेदनातून देण्यात आली आहे.

गीते यांनी निवेदन स्वीकारून यासंदर्भात सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री रामेश्वर भुकन, जिल्हा हिंदु संघटक बापू ठाणगे, हिंदुत्वनिष्ठ संजय जोशी, दिगंबर गेंट्याल, चैतन्य शेकडे, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? शासकीय निर्णयाची प्रभावी कार्यवाही तत्परतेने कधी होणार ?