जळगाव येथील साधिका सौ. जयश्री पाटील यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्यासाठी निघतांना जाणवलेली सूत्रे आणि त्यांनी रामनाथी आश्रमात पोचल्यावर अनुभवलेली भावस्थिती !

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्यासाठी निघण्याच्या आदल्या दिवसापासून सर्दी होणे, ताप येणे आणि प्रचंड अंगदुखी चालू होणे

सौ. जयश्री पाटील

‘२०.७.२०२३ या दिवशी संध्याकाळी ७ वाजता मला जळगाव येथून रामनाथी (गोवा) येथे सनातनच्या आश्रमात जाण्यासाठी निघायचे होते. त्याच्या आदल्या दिवशी मला सर्दी झाली आणि ताप येऊन प्रचंड अंगदुखी चालू झाली. रामनाथी आश्रमात जाण्यासाठी निघण्याच्या दिवशीही मला ताप, थकवा आणि अंगदुखी होती. त्यामुळे माझ्या मनात ‘कदाचित् माझे जाणे रहित होईल’, असा विचार येत होता.

२. साधिकेला गुरुदेवांचे ‘स्वेच्छा सोडून दे’, हे वाक्य आठवणे आणि मन स्थिर होणे

पूर्वी मला गुरुदेवांच्या लाभलेल्या सत्संगात त्यांनी मला ‘‘स्वेच्छा सोडून दे’’, असे सांगितले होते. मला त्यांचे बोलणे आठवले. त्यामुळे माझे मन अत्यंत स्थिर होते. मला वाटले, ‘गुरुदेवांनी माझे येणे निश्चित केले असेल, तर कोणतीही परिस्थिती मला जाण्यापासून अडवू शकत नाही आणि माझी आश्रमात जाण्याची वेळ अजून आली नसेल, तर मी कितीही प्रयत्न केले, तरीही मी जाऊ शकणार नाही.’

३. मला प्रवासात फारसा त्रास झाला नाही.

४. साधिका गोवा येथे पोचल्यावर आश्रमाच्या चारचाकी गाडीत बसल्यावर तिला ‘लहान बालिका होऊन श्री गुरूंच्या कुशीत शिरले आहे’, असे वाटून पुष्कळ हलकेपणा जाणवणे आणि आनंद होणे

२०.७.२०२३ या दिवशी आम्ही जळगाव येथून रेल्वेने गोवा येथे जायला निघालो. तेव्हा रेल्वेच्या प्रवासात तेथील अस्वच्छता आणि रज-तम युक्त वातावरण यांनी मला पुष्कळ गुदमरल्यासारखे होत होते. आम्ही मडगाव रेल्वेस्थानकाबाहेर आल्यावर साधक आम्हाला न्यायला आले. तेव्हा आश्रमाच्या चारचाकी गाडीत बसल्यावर मला जाणवले, ‘मी लहान बाळ असून श्री गुरूंच्या कुशीत शिरले आहे.’ मला पुष्कळ हलकेपणा जाणवला आणि आनंद झाला.

५. रामनाथी आश्रमात आलेल्या अनुभूती

५ अ. रामनाथी आश्रमात प्रवेश केल्यावर ‘मी साक्षात् वैकुंठातच प्रवेश करत आहे’, असे मला वाटले.

५ आ. मी आश्रमात पोचल्यावर मला काहीही त्रास झाला नाही.

५ इ. आश्रमातील साधकांच्या चेहर्‍यावरील आनंद आणि तेज पाहून मला वाटले, ‘प्रत्येक साधक वैकुंठातील देवता आहे.’ मला त्यांच्याकडे पाहून पुष्कळ आनंद होत होता.

५ ई. महाप्रसाद ग्रहण करत असतांना अनेक संतांचे दर्शन होणे आणि भाव जागृत होऊन पुष्कळ आनंद मिळणे : मी महाप्रसाद ग्रहण करत असतांना मला पू. संदीप आळशी यांचे दर्शन झाले. नंतर मला सद्गुरु नंदकुमार जाधव, पू. अशोक पात्रीकर, पू. रेखा काणकोणकर यांचे दर्शन झाले. तेव्हा माझ्या मनात ‘देवा, जिथे तिथे मला तुझेच रूप दिसू लागले । देवा, तुझ्या दर्शनाचे मला वेड लागले ।’, या ओळी सतत येत होत्या. माझा भाव जागृत होऊन मला पुष्कळ आनंद होत होता.’

६. अनुभवलेली भावस्थिती

६ अ. शहाळ्याचे पाणी पितांना ‘अमृत प्राशन करत आहे’, असे वाटणे : मी स्वयंपाकघरात सेवा करत असतांना एका ताईने मला शहाळ्याचे पाणी पिण्यासाठी दिले. तेव्हा ‘जणू काही सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी मला अमृतच प्राशन करायला दिले आहे. त्यामुळे मला असलेला अनिष्ट शक्तींचा त्रास नष्ट होणार आहे. माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांची केंद्रे नष्ट होणार आहेत’, असे वाटून माझा भाव जागृत झाला. ते शहाळ्याचे पाणी अत्यंत मधुर होते. ‘खरोखरच मी अमृत प्राशन करत आहे’, असे मला वाटत होते.

६ आ. ‘पू. रेखा काणकोणकर अन्नपूर्णामातेसम आहेत’, असे जाणवणे : एक दिवस आम्ही दुपारी विश्रांती घेऊन सेवेसाठी आल्यावर मला पू. रेखाताई महाप्रसाद ग्रहण करत असतांना दिसल्या. तेव्हा ‘पू. रेखाताई अन्नपूर्णामाता आहेत आणि ज्याप्रमाणे क्षेत्रातील सर्व लोकांनी अन्न ग्रहण केल्यानंतर अन्नपूर्णामाता अन्न ग्रहण करते, त्याप्रमाणे सर्व साधकांनी महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर पू. रेखाताई महाप्रसाद ग्रहण करत आहेत’, असे वाटून माझा भाव जागृत झाला. मी त्यांना मानस वंदन केले.

६ इ. साधक सेवा करत असतांना मला ‘प्रत्येक साधकाच्या अंतरात गुरुकृपेची पुष्कळ तळमळ आहे. ती तळमळ त्यांना सेवा करण्याचे बळ देत आहे’, असे वाटून पुष्कळ शिकायला मिळत होते. माझाही उत्साह वाढून मलाही सेवेतील आनंद घेता येत होता.

६ ई. रामनाथी आश्रमातून निघण्याच्या आधी अनुभवलेली भावस्थिती

६ ई १. गुरुदेवांच्या दिव्य चरणांचे स्मरण होऊन त्यांना ‘आयुष्यभर व्यष्टी आणि समष्टी साधना करण्यासाठी पुरेल एवढे बळ आणि चैतन्य द्या’, अशी प्रार्थना होणे अन् अश्रू अनावर होणे : ३०.७.२०२३ या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर माझ्या लक्षात आले, ‘आता मी केवळ ५ दिवसच आश्रमात सेवेला असणार आहे.’ तेव्हा मला गुरुदेवांच्या दिव्य चरणांचे स्मरण होऊन माझ्याकडून ‘हे गुरुमाऊली, मला आयुष्यभर व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी पुरेल एवढे बळ अन् चैतन्य द्या. यापुढे कधीही माझ्याकडून व्यष्टी आणि समष्टी साधनेमध्ये खंड पडू देऊ नका. आपली भक्ती करण्यासाठी मला अपार शक्ती प्रदान करा’, अशी पुनःपुन्हा प्रार्थना होत होती. तेव्हा माझ्या डोळ्यांतील अश्रू अनावर झाले.

६ ई २. भावाश्रू थांबण्यासाठी प्रार्थना केल्यावर डोळ्यांतून अश्रू येण्याचे थांबणे; परंतु प्रार्थना चालूच रहाणे : मी ही स्थिती सकाळी ६ ते ९ या वेळेत अखंड अनुभवत होते. मला प्रयत्न करूनही डोळ्यांतील अश्रूंवर नियंत्रण मिळवता येत नव्हते. मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘हे श्रीहरि, माझ्यावर कृपा कर आणि मला या स्थितीतून बाहेर पडता येऊ दे.’ त्यानंतर १० मिनिटांनी माझ्या डोळ्यांतून येणारे अश्रू थांबले, तरीही नंतर थोडा वेळ माझी प्रार्थना होत होती.

– सौ. जयश्री पाटील, जळगाव (१०.९.२०२३)

सौ. जयश्री पाटील यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आधी अनुभवलेली भावस्थिती !

सद्गुरु नंदकुमार जाधव

 १. ‘वर्ष २०२१ मधील श्रीकृष्ण जन्माष्टमीला ८ ते १० दिवस शेष असतांना माझ्या अंतर्मनात सतत येत होते, ‘मी हातांच्या ओंजळीत सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) सुकोमल चरण घेतले आहेत. प.पू. गुरुमाऊली साक्षात् श्रीकृष्णाचे रूप आहेत. त्यामुळे त्यांचे चरणकमल निळ्या रंगाचे दिसत आहेत. मी श्री गुरूंना म्हणत आहे, ‘देवा, मी या चरणांना नीलकमल म्हणू कि नीलचरण म्हणू ! देवा, मी साधनेला आरंभ केला, तेव्हा ‘मोक्षप्राप्ती व्हावी’, हा माझा साधना करण्याचा उद्देश होता. आज मला तुझ्या या दिव्य चरणांचे इतक्या जवळून दर्शन झाले आणि मला वाटू लागले, ‘देवा, तू जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अवतार घेशील, त्या प्रत्येक वेळी मला तुझ्या समवेत पृथ्वीवर जन्माला यायचे आहे.’

२. माझा जसा अंतर्मनातून आपोआप नामजप चालू होतो, तसेच हे विचार आपोआपच माझ्या अंतर्मनामध्ये घोळत होते. कधी कधी माझ्या नकळतच माझ्या हातांची ओंजळ होत असे. तेव्हा मला ओंजळीत कधी श्री गुरूंचे दिव्य चरण दिसत असत, तर कधी बाळकृष्णाचे इवलेसे चरण दिसत.

३. साधिकेने मनाच्या स्थितीविषयी सद्गुरु नंदकुमार जाधव यांना सांगणे

अ. मला मधून मधून वाटत होते, ‘माझे काही चुकत तर नाही ना ? सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली आम्हा प्रत्येकाला मोक्षप्राप्ती होण्यासाठी अखंड कार्यरत आहेत आणि मी मात्र देवाला ‘मला मोक्ष नको, तर मला तुझ्या दिव्य चरणांजवळ जागा हवी !’, असे सांगत आहे.’ मी सद्गुरु नंदकुमार जाधव यांना भ्रमणभाष करून माझी स्थिती सांगितली आणि त्यांना ‘‘माझे काही चुकत आहे का ?’’ असे विचारले.

आ. तेव्हा सद्गुरु जाधवकाकांनी सांगितले, ‘‘गुरुचरणांची प्राप्ती, हाच आपला मोक्ष आहे.’’ त्यांचे बोलणे ऐकून मला पुष्कळ आनंद झाला.

३. प्रार्थना

तेव्हापासून माझ्याकडून ‘गुरुमाऊली, मला तुमच्या दिव्य चरणांची प्राप्ती होऊ दे’, अशी सतत प्रार्थना होते.

४. कृतज्ञता

‘हे गुरुमाऊली, ज्यांच्याकडे मनातील सर्वकाही मनमोकळेपणाने व्यक्त करता येते आणि साधनेसाठी योग्य मार्गदर्शन करणारे, आपलेच एक रूप असणारे सद्गुरु जाधवकाका आपण आम्हाला दिले आणि सुंदर ध्येय दिले’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. जयश्री पाटील, जळगाव (१०.९.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक