थेऊरच्या (जि. पुणे) लाचखोर मंडल अधिकारी जयश्री कवडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला !

मुंबई उच्च न्यायालय

थेऊर (जि. पुणे) – थेऊरच्या पसार आणि लाचखोर मंडल अधिकारी जयश्री कवडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. यापूर्वीही जिल्हा सत्र न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. कोलवडी (ता. हवेली) गावातील एका शेतकर्‍याची सातबारा उतार्‍यावरील फेरफार नोंद संमत करण्यासाठी ७ सहस्र रुपयांची लाच स्वीकारली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात १३ मार्च या दिवशी गुन्हा नोंद केला होता. गुन्हा नोंद झाल्यापासून कवडे या पसार झाल्या आहेत. या प्रकरणांमध्ये अटक टाळण्यासाठी कवडे यांनी पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाने २२ मार्च या दिवशी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

खासगी व्यक्तींच्या वतीने लाच स्वीकारणे

मंडल अधिकारी कवडे या विजय नाईकनवरे आणि योगेश तातळे या खासगी व्यक्तींच्या वतीने लाच घेत होत्या. या दोघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. विजय नाईकनवरे यांच्यावर २० दिवसांमध्ये लाच मागितल्याचे २ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

संपादकीय भूमिका

लाचखोरीमध्ये महिलांनीही अग्रेसर असणे दुर्दैवी ! अशा लाचखोर अधिकार्‍यांना कडक शिक्षा होणे आवश्यक आहे !