खच्चून भरलेल्या प्रवाशांमुळे दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमध्ये शेकडो प्रवाशांना चढताच आले नाही !

दिवा आणि पनवेल स्थानकांतील प्रकार !

पनवेल – प्रवासी संघटनांनी होळीनिमित्त होणार्‍या गर्दीची पूर्वकल्पना देऊनही रेल्वे प्रशासनाने मुंबईतून चिपळूण आणि रत्नागिरी येथे जाण्यासाठी एकही विशेष गाडी सोडली नाही. परिणामी दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमध्ये दिवा आणि पनवेल स्थानकांतील शेकडो प्रवाशांना गर्दीमुळे चढता आले नाही. यामुळे प्रवासी संतप्त आहेत.

रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी अल्प करण्यासाठी आणि चाकरमान्यांसाठी ‘दादर-चिपळूण स्वतंत्र विशेष गाडी चालवावी’, अशा मागणीचे निवेदन कोकण विकास समितीने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह रेल्वेच्या अधिकार्‍यांकडे काही दिवसांपूर्वी दिले होते; पण तसे झालेला नाही.

संपादकीय भूमिका

शहरातील वाढती लोकसंख्या, प्रवाशांची वाढती गर्दी, तसेच त्यांची होणारी ससेहोलपट पहाता रेल्वे प्रशासन या समस्येवर उपाययोजना कधी काढणार ?