आनंदी आणि तळमळीने सामाजिक कार्य करणारे सांगली येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. भूपालराव धुळ्ळाप्पाण्णा नवले (वय ९१ वर्षे) !

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे महत्त्व !

ईश्वराची आध्यात्मिक पातळी जर १०० टक्के मानली आणि निर्जीव वस्तूंची ० टक्के मानली, तर सर्वसाधारण मनुष्याची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते. या पातळीची व्यक्ती केवळ स्वतःच्या सुख-दुःखाचा विचार करते. समाजाशी तिचे काही देणे-घेणे नसते आणि ‘मीच सर्व करते’, असा तिचा विचार असतो. आध्यात्मिक पातळी ३० टक्के होते, तेव्हा ती ईश्वराचे अस्तित्व थोड्या प्रमाणात मान्य करू लागते, तसेच साधना आणि सेवा करू लागते. मायेची आणि ईश्वरप्राप्तीची ओढ सारखीच झाली की, व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्के होते. आध्यात्मिक पातळी जेव्हा ६० टक्के होते, तेव्हा ती व्यक्ती मायेपासून अलिप्त होऊ लागते. तिच्या मनोलयाला आरंभ होतो आणि विश्वमनातील विचार ग्रहण होऊ लागतात. मृत्यूनंतर ती जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटून तिला महर्लाेकात स्थान प्राप्त होते.

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘१९.२.२०२४ या दिवशी भूपालराव धुळ्ळाप्पाण्णा नवले यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९१ वर्षे होते. ते श्रीमती प्रमिला पाटील (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ८२ वर्षे) यांचे मोठे बंधू आणि वैद्या सुश्री (कु.) माया पाटील यांचे मामा होते. त्यांना कै. भूपालराव यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत. 

कै. भूपालराव नवले

१. श्रीमती प्रमिला पाटील (कै. भूपालराव यांची बहीण, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ८२ वर्षे)

१ अ. आनंदी : ‘मी १ मासापूर्वी भूपालराव यांच्या समवेत ४ दिवस राहिले होते. तेव्हा ‘ते अतिशय आनंदी आहेत’, असे मला जाणवले.

१ आ. देवाच्या अनुसंधानात असणे : ते जपमाळ घेऊन सतत नामजप करायचे. ते मला म्हणायचे, ‘‘तुझा मार्ग चांगला आहे.’’ ते देवाच्या अनुसंधानात होते. ते मायेतील गोष्टींविषयी बोलत नव्हते.

१ इ. निधनानंतर जाणवलेली सूत्रे 

१. त्यांचे अंत्यदर्शन घेतांना ‘त्यांचा श्वास चालू आहे’, असे मला वाटले. त्यांचा चेहरा पुष्कळ तेजस्वी आणि आनंदी दिसत होता.

२. घरात दाब न जाणवता वातावरण आनंदी आणि चैतन्यमय होते.

२. वैद्या सुश्री (कु.) माया पाटील (कै. भूपालराव यांची भाची), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

२ अ. ‘ते शांत आणि प्रेमळ होते. त्यांनी कुणालाही दुखावले नाही.

२ आ. ते मनमिळाऊ होते. ‘सर्वांना साहाय्य करणे’ हा त्यांचा स्थायीभाव होता.

२ इ. उच्च पदावर कार्यरत असणे : ते वसंतराव शेतकरी सहकारी साखर कारखान्यामध्ये ३० वर्षे वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत होते.

२ ई. तळमळीने सामाजिक कार्य करणे : त्यांनी पुढाकार घेऊन सांगली येथे पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा (मॉडर्न एज्युकेशन सोसायटी) स्थापन केली. त्यांनी ४० वर्षे या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. ते ‘वुमेन्स एज्युकेशन सोसायटी’चे सदस्य आणि ‘सांगली शहर ॲमच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन’चे संस्थापक सदस्य होते. त्यांनी विविध संस्थांमध्ये तळमळीने सामाजिक कार्य केले. यात त्यांना अनेक अडचणी आल्या. अनेक व्यक्तींना हाताळावे लागले, तरीही ते कुणावर चिडले नाहीत. त्यांच्या मनात कुणाविषयी राग, द्वेष, मत्सर नव्हता.

२ उ. शांतपणे मृत्यू होणे : त्यांचा मृत्यू शांतपणे झाला. याचे सर्वांना आश्चर्य वाटले. त्यांचा मुलगा भूलतज्ञ डॉ. राजेश यांच) ‘असा मृत्यू होऊ शकतो’, यावर विश्वासच बसेना.’

३. आध्यात्मिक पातळी ६१ टक्के  होण्याविषयी मिळालेली पूर्वसूचना

आम्हाला ‘त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली असावी’, असे वाटत होते.’

– (श्रीमती प्रमिला पाटील, वैद्या सुश्री (कु.) माया पाटील आणि सौ. आशा कागवाड (कै. भूपालराव यांची भाची))

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २९.२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक