Mani Shankar Aiyar : (म्हणे) ‘भारताच्या शत्रूत्वामुळे पाकिस्तानीही शत्रूत्वाने वागतात !’ – काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर

काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर यांची पाकिस्तानात जाऊन पुन्हा एकदा भाजप सरकारवर टीका

काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर

लाहोर (पाकिस्तान) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणीशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानात जाऊन भारतातील भाजप सरकारच्या विरोधात गरळओक केली आहे. ते म्हणाले, ‘‘जर आपण (भारत) मैत्रीपूर्ण असू, तर त्यांचे (पाकिस्तानची) वर्तनही अतिशय मैत्रीपूर्ण असेल आणि जर आपण शत्रुत्वाने वागणार असू, तर त्यांची वागणूकही खूप प्रतिकूल असेल. माझा अनुभव सांगतो की, पाकिस्तानी कदाचित् दुसर्‍या बाजूने अधिक प्रतिक्रिया देतात.’ ते येथे आयोजित फैज महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशीच्या सत्रात बोलत होते. ‘इतर कोणत्याही देशापेक्षा पाकिस्तानमध्ये माझेे अधिक मोकळ्या मनाने स्वागत करण्यात आले’, असेही ते या वेळी म्हणाले. अय्यर यांनी यापूर्वीच भाजप सरकारच्या विरोधात पाकमध्ये जाऊन विधाने केली होती.

मणीशंकर अय्यर पुढे म्हणाले की,

१. पाकिस्तानला सद्भावनेची आवश्यकता होती; मात्र वर्ष २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या १० वर्षांत सद्भावनेऐवजी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे.

२. जेव्हा ते कराचीमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्त झाले होते, तेव्हा प्रत्येकजण त्यांची आणि त्यांच्या पत्नीची काळजी घेत असत. त्यांनी त्यांच्या ‘मेमोयर्स ऑफ अ मॅव्हरिक’ या पुस्तकात अशा अनेक घटना लिहिल्या आहेत, ज्यात पाकिस्तान हा भारतियांच्या कल्पनेपेक्षा पूर्णपणे वेगळा देश असल्याचे दिसून येते, असे म्हटले आहे.

(सौजन्य : Republic World)

संपादकीय भूमिका

वैचारिक सुंता झालेले काँग्रेसी नेते मणीशंकर अय्यर भारताचे नसून पाकिस्तानचे नागरिक आहेत, असेच यातून म्हणावे लागेल ! भारताने अशांना परत देशात घेण्यापेक्षा पाकिस्तानमध्येच रहाण्यास सांगितले पाहिजे !