China On India Philippines : (म्हणे) ‘दोन्ही देशांनी तिसर्‍या देशाच्या सार्वभौमत्वाची काळजी घ्यायला हवी !’ – चीन

भारत-फिलिपाईन्स यांच्या नौदलांच्या एकत्रित सरावामुळे चीन अस्वस्थ !

बीजिंग – भारत आणि फिलिपाईन्स यांच्या नौदलांच्या युद्धनौकांच्या दक्षिण चीन समुद्रात झालेल्या एकत्रित सरावामुळे चीन अस्वस्थ झाला आहे. चीनने एक निवेदन प्रसिद्ध करून म्हटले आहे की, दोन्ही देशांनी तिसर्‍या देशाच्या सार्वभौमत्वाची काळजी घ्यायला हवी, तसेच प्रादेशिक शांततेला धक्का पोचवू नये.

१. फिलिपाईन्स आणि चीन यांचे नौदल वादग्रस्त दक्षिण चीन समुद्राच्या काही भागांमध्ये वारंवार समोरासमोर येतात. या महिन्यात फिलिपाईन्सच्या नौदलाने ‘चिनी युद्धनौकांनी त्याच्या युद्धानौकांवर तोफांचा मारा केला’ असा आरोप केला होता.

२. चीनने कुठल्याही देशाचे नाव न घेता सांगितले की, चीन आणि फिलिपाईन्स  यांच्यातील सागरी वाद, हे २ देशांतील सूत्र आहे. चीन राष्ट्रीय सार्वभौमत्व, सुरक्षा आणि सागरी हक्क यांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करील.

३. चीनने वारंवार दिलेल्या चेतावणीकडे दुर्लक्ष करून फिलिपाईन्सने चीनचा दावा असलेल्या भागात नौका पाठवली. ही नौका चीनच्या तटरक्षक दलाच्या नौकेवर आदळली आणि चीनच्या नौकेची हानी झाली. त्यानंतर वाद निर्माण झाला.

संपादकीय भूमिका

चीनने स्वतःहून किती देशांच्या सार्वभौमत्वाची काळजी घेतली, हे जगाला ठाऊक आहे. तैवानला गिळंकृत करण्यासाठी चीनचा जो आटापिटा चालला आहे, तो जग पाहात आहे. त्यामुळे चीनने भारताला शहाणपणे शिकवू नये !