Pakistan Relations : भारत आणि अफगाणिस्तान यांच्याशी संबंध सुधारायचे आहेत, तर चीनशी अधिक दृढ करायचे आहेत ! – पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारत, अफगाणिस्तान आणि इराण यांसारख्या देशांशी संबंध सुधारण्याची आवश्यकता आहे. आपल्याला चीनशी सशक्त संबंध निर्माण करायचे आहेत, असे विधान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केले आहे. ते त्यांच्या पी.एम्.एल्.-एन्. पक्षाच्या बैठकीत बोलत होते.

सौजन्य : विऑन 

नवाझ शरीफ यांनी, ‘पाक सैन्याच्या कारगिलवरील आक्रमणाला विरोध केल्यामुळे वर्ष १९९९ मध्ये मला सत्ताच्युत करण्यात आले होते. मी कारगिल युद्धाविषयी म्हटले होते की, ते योग्य नाही. त्यावर तत्कालीन सैन्यदलप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी मला पदावरून काढून टाकले. नंतर माझे सूत्र खरे ठरल’, असा दावा केला.

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविषयी शरीफ म्हणाले की, इम्रान खान यांच्या सरकारच्या काळात पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. इम्रान खान यांच्या सारख्या अनुभव नसलेल्या व्यक्तीकडे सत्तेची सूत्रे का दिली गेली ?, हे मला कळत नाही.

संपादकीय भूमिका 

भारताशी संबंध सुधारण्यासाठी पाकने काय करायला हवे, हे त्याला ठाऊक आहे. ‘पाक जिहादी आतंकवाद्यांवर कारवाई करणार का ?’, ‘पाकव्याप्त काश्मीर परत देणार का ?’, हेच मूळ प्रश्‍न आहेत !