चिकित्सेसाठी विदेशी संगीतापेक्षा भारतीय संगीत अधिक परिणामकारक !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून रामटेक (नागपूर) येथे ‘संगीत चिकित्सेमध्ये भारतीय संगीताचे महत्त्व !’ या विषयावरील संशोधन ‘ऑनलाईन’ सादर

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे मार्गदर्शक, तर कु. तेजल पात्रीकर या आहेत लेखिका !

फोंडा (गोवा) : ‘संगीत ही मानवजातीला परमेश्वराकडून मिळालेली एक अनमोल देणगी आहे. संगीताच्या माध्यमातून मनुष्य तणावमुक्त होऊ शकतो. ईश्वराशी एकरूपता अनुभवू शकतो’; मात्र ‘सध्या संगीताला अशांती अन् पतन यांचे माध्यम बनवले जात आहे’, अशी चिंता जगभरातील समाजशास्त्रज्ञ सातत्याने व्यक्त करत असतात. ‘भारतीय शास्त्रीय संगीत हे विदेशी संगीताच्या तुलनेत विविध प्रकारच्या व्याधी न्यून करण्यासह आध्यात्मिक स्तरावरही परिणामकारक असल्याचे संशोधनातून समोर आले आहे’, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विशारद कु. तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी केले. त्या रामटेक येथील ‘कवी कुलगुरु कालीदास संस्कृत विद्यापीठ’ यांनी आयोजित केलेल्या ‘इंडियन नॉलेज सिस्टीम – फ्यूचर डायमेंशन’, या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘ऑनलाईन’ बोलत होत्या. या परिषदेत त्यांनी ‘संगीत चिकित्सेमध्ये भारतीय संगीताचे महत्त्व !’, या विषयावर शोधनिबंध सादर केला. विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे मार्गदर्शक, तर कु. तेजल पात्रीकर या लेखिका आहेत.

कु. तेजल पात्रीकर

कु. तेजल पात्रीकर यांनी मांडलेली सूत्रे –

१. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘उच्च रक्तदाबाचा विकार असणार्‍या व्यक्तींवर भारतीय शास्त्रीय संगीत, देवतांचा नामजप, बीजमंत्र, ॐकार, तसेच विदेशांतील ‘मार्कोनी युनियन’चे (ब्रिटीश बँडचे नाव) ‘वेटलेस’ या संगीताचा काय परिणाम होतो’, याचा अभ्यास करण्यात आला.

२. सध्या ‘मार्कोनी युनियन’ हे ताण हलका व्हावा आणि ‘वेटलेस’ हे रक्तदाब न्यून होण्यासाठी जगप्रसिद्ध आहेत. या संशोधनात्मक चाचणीसाठी तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उच्च रक्तदाब असलेल्या काही रुग्णांना निवडण्यात आले. संशोधनासाठी ‘युनिर्व्हसल ऑरा स्कॅनर’ (‘यू.ए.एस्.’)चा वापर करण्यात आला.

३. या प्रयोगात भारतीय संगीतातील ‘राग गोरखकल्याण’ ऐकल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी सर्वांचा रक्तदाब मोजण्यात आला. त्या वेळी ५ पैकी ४ जणांचा रक्तदाब संगीत ऐकण्यापूर्वीच्या त्यांच्या रक्तदाबाच्या तुलनेत घटला, तर एकाचा रक्तदाब सामान्य होता. ‘वाढलेल्या रक्तदाबामध्ये घट झाली आणि ७२ घंटे औषधोपचार न करताही ती टिकली’, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.

४. संगीत ऐकल्यानंतर व्यक्तींची नकारात्मक ऊर्जा सरासरी ६० टक्के घटली आणि त्यांच्या सकारात्मक ऊर्जेत सरासरी १५५ टक्के वाढ झाली. असाच परिणाम शास्त्रीय संगीतासह देवतांचा नामजप, बीजमंत्र आणि ॐकार यांच्या ऐकण्याचाही रुग्णांवर झाला.

परिषदेत शोधनिबंध सादर केल्यानंतर मिळालेला सकारात्मक प्रतिसाद

सादर केलेला विषय सगळ्यांनाच पुष्कळ आवडला. माझा विषय मांडून झाल्यावर मी शोधनिबंध सादर करण्याच्या ज्या गटात होते, त्यात मला ‘विषय पुष्कळ छान सादर केला’, अशा आशयाचे संदेश आले. त्यापैकी पुणे येथील एका संशोधकांनी मला भ्रमणभाष करून विश्वविद्यालयाचे कार्य प्रत्यक्ष जाणण्याची इच्छाही व्यक्त केली.

५. या संशोधनामध्ये ‘मार्कोनी युनियन’चे ‘वेटलेस’ असलेले ‘रिलॅक्स म्युझिक’ही (ताण हलका करणारे संगीत) ऐकवले. या प्रयोगानंतरही दोघांचा रक्तदाब न्यून झाला; मात्र दोघांच्या नाडीचे ठोके वाढले, तसेच ‘यू.ए.एस्.’ यंत्राद्वारे केलेल्या चाचणीत त्यांच्या नकारात्मकतेत सरासरी ५३ टक्के वाढ झाली, तर एकाची सकारात्मक प्रभावळ ५३ टक्क्यांनी घटली आणि दुसर्‍याची सकारात्मक प्रभावळ पूर्णपणे न्यून झाली.

६. यातून लक्षात आले की, भारतीय संगीत आणि नाद चिकित्सा यांतून व्याधी न्यून होण्यासह व्यक्तीची सकारात्मक प्रभावळ ही वाढते, तसेच विदेशी संगीतामुळे व्याधी जरी न्यून होत असली, तरी नकारात्मकतेत वाढ होते. भारतीय संगीतामध्ये मुळातच सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) आहे. याचा परिणाम दूरगामी टिकणारा असतो. भारतीय संगीतामुळे रुग्णांना सकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात मिळून त्यांची रोगप्रतिकार क्षमताही वाढते.

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर