दिवाळीत फटाके फोडणे टाळा आणि मास्क वापरा !  

राज्यात वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई – राज्यात वायूप्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने आरोग्य विभागाकडून नियमावली घोषित करण्यात आली आहे. राज्यातील १७ मुख्य शहरांमध्ये प्रदूषणामुळे आजारांचा धोका वाढला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने दक्षता घेण्याची सूचना केली आहे. धूलिकण वाढल्याने ‘दिवाळीत फटाके फोडणे टाळा आणि मास्क वापरा’, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

आरोग्य विभागाच्या अन्य सूचना

१. सकाळी आणि संध्याकाळी घराबाहेर चालणे टाळा.

२. सकाळी आणि संध्याकाळी घराचे दरवाजे आणि खिडक्या उघडू नका.

३. दुपारी १२ ते ४ या वेळेतच बाहेर पडा.

४. लाकूड, कोळसा, आणि अन्य ज्वलनशील गोष्टी जाळणे टाळा.

कोणत्या शहरांसाठी आरोग्य विभागाची नियमावली आहे ? – मुंबई, नवी मुंबई, नाशिक, अमरावती, सांगली, सोलापूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, अकोला, बदलापूर, उल्हासनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर आणि चंद्रपूर