भुकेकंगाल पाकने केली ‘घोरी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी !

रावलपिंडी (पाकिस्तान) – पाकने २४ ऑक्टोबर या दिवशी ‘घोरी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता १ सहस्र ३०० किमीपर्यंत आहे. ५ वर्षांपूर्वीही या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. हे क्षेपणास्त्र ७०० किलो वजनाची परमाणू शस्त्रे वाहून नेऊ शकते, असा दावा पाककडून वारंवार करण्यात येतो. यासमवेतच असे सांगण्यात येते की, कराची आणि सियालकोट या शहरांच्या मध्ये भारताच्या सीमेवर ही क्षेपणास्त्रे ६ ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.  तेथून जालंधर, जैसलमेर, देहली, कर्णावती, मुंबई, नागपूर, चेन्नई यांसारख्या भारतीय शहरांना लक्ष्य करण्यास सक्षम असल्याचेही सांगण्यात येते.

काही दिवसांपूर्वी म्हणजेच १८ ऑक्टोबरला ‘अबाबील’ नावाच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झाली होती.

संपादकीय भूमिका

एखादा देश भुकेकंगाल झाल्यास तो प्रथम या स्थितीतून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतो आणि देशाच्या तिजोरीत असलेले पैसे त्यासाठी खर्च करतो. पाकमध्ये पराकोटीचा भारतद्वेष भिनला असल्याने तो आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अण्वस्त्रसज्ज होण्यासाठी प्रयत्न करतो. अशा पाकला जन्माची अद्दल घडवण्यासाठी भारताने प्रयत्न करावेत !