ठाणे येथील ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या (कै.) सौ. नम्रता ठाकूर (वय ६२ वर्षे) यांच्‍या आजारपणात त्‍यांचे यजमान श्री. नंदकुमार ठाकूर यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

६.१०.२०२३ या दिवशी (कै.) सौ. नम्रता ठाकूर यांचा निधनानंतरचा १० वा दिवस आहे. त्‍या निमित्ताने…

सौ. नम्रता ठाकूर

ठाणे येथील सनातन संस्‍थेच्‍या साधिका सौ. नम्रता नंदकिशोर ठाकूर (वय ६२ वर्षे, आध्‍यात्‍मिक पातळी ६७ टक्‍के) यांचे २७.९.२०२३ या दिवशी सकाळी ६ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ६.१०.२०२३ या दिवशी त्‍यांच्‍या निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांच्‍या आजारपणात त्‍यांचे पती श्री. नंदकुमार ठाकूर यांनी अनुभवलेली गुरुकृपा येथे पाहूया.

१. सौ. नम्रता ठाकूर यांच्‍या मेंदूत गाठ असल्‍याने त्‍यावर उपचार करण्‍यासाठी सप्‍तरंगी या वनस्‍पतीचे औषध देणार्‍या वैद्यांचा शोध घेणे

‘३.७.२०२३ या दिवशी माझी पत्नी सौ. नम्रता ठाकूर हिला रुग्‍णालयातून घरी आणले. तेव्‍हा तिला स्‍मृतीभ्रंश झाल्‍याचे लक्षात आले. आधुनिक वैद्या अंजली पाटील यांना मी पत्नीचे सर्व चाचणी अहवाल दाखवले. त्‍यांनी सांगितल्‍यानुसार आम्‍ही तिला ‘न्‍यूरोलॉजिस्‍ट’कडे (मेंदू आणि मज्‍जासंस्‍थेच्‍या विकारांवर उपचार करणार्‍या आधुनिक वैद्यांकडे) घेऊन गेलो. त्‍यांनी आम्‍हाला ‘एम्.आर्.आय.’ चाचणी (हे रोगाचे निदान करण्‍यासाठी शरिराच्‍या अंतर्गत भागांची छायाचित्रे काढण्‍याचे तंत्रज्ञान आहे.) करायला सांगितले. त्‍या अहवालानुसार पत्नीच्‍या मेंदूत गाठ असल्‍याचे कळले. तेव्‍हा माझ्‍या सुनेने ‘यासाठी सप्‍तरंगीच्‍या औषधाचा उपयोग होतो’, असे सांगितले; म्‍हणून मी मुंबई येथील साधक आधुनिक वैद्य धुरी यांना भ्रमणभाष केला. तेव्‍हा त्‍यांनी ‘हे औषध त्र्यंबकेश्‍वर (नाशिक) येथील आश्रमामध्‍ये मिळते’, असे सांगितले. आम्‍ही ‘हे औषध ठाण्‍यात मिळते का ?’ याचा शोध घेतला. तेव्‍हा एका वैद्यांचा पत्ता आणि भ्रमणभाष क्रमांक मिळाला.

श्री. नंदकिशोर ठाकूर

२. ‘रुग्‍ण सनातनची साधिका असल्‍याने वेदना होत नाहीत आणि देवच त्‍यांना बरे करील’, असे वैद्यांनी सांगणे

माझ्‍या मुलाने (श्री. अंकुरने) ठाणे येथील सप्‍तरंगी वनस्‍पतीचे औषध देणार्‍या आयुर्वेदीय वैद्यांना संपर्क करून माझ्‍या पत्नीच्‍या व्‍याधीविषयी सांगितले. त्‍यांचे वय ८३ वर्षे होते. तेव्‍हा वैद्यांनी विचारले, ‘‘रुग्‍णाचे डोके दुखते का ?’’ मुलाने ‘नाही’, असे सांगितले. तेव्‍हा वैद्य म्‍हणाले, ‘‘अशक्‍य आहे. या रोगात रुग्‍णाचे डोके एवढे दुखते की, ते सहनही करता येत नाही. त्‍यावर ‘मॉरफिन’ सारख्‍या (वेदनाशामक) गोळ्‍या देऊनही काही लाभ होत नाही. रुग्‍णाला भूल (अनेस्‍थिशिया) द्यावी लागते.’’ त्‍यांनी विचारले, ‘‘तुमच्‍या आई देवाचे काही करतात का ?’’ तेव्‍हा माझा मुलगा म्‍हणाला, ‘‘आई सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करते.’’ त्‍यावर ते वैद्य म्‍हणाले, ‘‘म्‍हणूनच त्‍यांना वेदना होत नाहीत. देवच त्‍यांना बरे करील.’’ त्‍यानंतर त्‍यांनी सप्‍तरंगीचे औषध दिले.

३. गुरुकृपेने अनेक वैद्यांचे साहाय्‍य मिळाल्‍यामुळे व्‍यक्‍त केलेली कृतज्ञता !

अ. माझ्‍या मित्राने ‘कर्नाटक येथील शिवमोग्‍गा येथे एक जण आयुर्वेदिक औषध देतो’, असे सांगितले; म्‍हणून तेथील सनातन संस्‍थेच्‍या साधकांनी तेथे जाऊन ते औषध पाठवून दिले. त्‍यानंतर आम्‍ही ते औषध चालू केले.

आ. माझ्‍या मुलाचा मित्र डॉ. मंदार यांनी सौ. नम्रताला घरी येऊन तपासले. त्‍यांनी काही सूत्रे सांगितली. त्‍याप्रमाणे औषध घेणे चालू केले.

इ. कोळखे येथील ‘अन्‍कॉलॉजिस्‍ट’ (कर्करोगावर औषध देणारे आधुनिक वैद्य) डॉ. राम हेसुद्धा घरी येऊन गेले. त्‍यांनी ‘केमो’ न देता काही औषध चालू केली.

या सर्वांचे मी आभार मानतो. असे सर्वांकडून साहाय्‍य मिळणे, हे समजण्‍याच्‍या पलीकडे आहे. हे सर्व नियोजन परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याविना होऊ शकत नाही. त्‍यांच्‍या कृपाशीर्वादामुळे आज पत्नीमध्‍ये सकारात्‍मक पालट होत आहेत. यासाठी आम्‍ही सर्व ठाकूर कुटुंबीय त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– श्री. नंदकिशोर ठाकूर, ठाणे. (वर्ष २०२३)

पत्नीचा आजार सुसह्य केल्‍याने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या चरणी श्री. नंदकिशोर ठाकूर यांनी व्‍यक्‍त केलेली कृतज्ञता !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘माझी पत्नी सौ. नम्रता ठाकूर हिचे वर्ष २००५ मध्‍ये ‘हिप जॉईन्‍ट’चे (कंबरेच्‍या सांध्‍याचे) शस्‍त्रकर्म झाले होते. त्‍यानंतर वर्ष २०१४ मध्‍ये तिला कर्करोग (कॅन्‍सर) झाला. नंतर वर्ष २०१८ मध्‍ये तिला पुन्‍हा कर्करोग झाला. जून २०२३ पासून तिला पुन्‍हा कर्करोगाचा त्रास चालू झाला. २७.९.२०२३ या दिवशी सकाळी ६ वाजता तिचे निधन झाले. मृत्‍यूपूर्वी आमच्‍यामध्‍ये (मी आणि पत्नीमध्‍ये) पुढीलप्रमाणे संवाद झाला.

सौ. नम्रता (यजमानांना उद्देशून) : माझ्‍या आजारपणामुळे तुम्‍हाला आर्थिक भार सोसावा लागत आहे.

मी : परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेमुळे आपला देवाण-घेवाण हिशोेब संपत आहे. गुरुदेवच (परात्‍पर गुरु डॉ. आठवले) आपला संसार चालवत आहेत. मी वर्ष १९९९ मध्‍ये स्‍वेच्‍छानिवृत्ती घेतली. त्‍यानंतर ‘संसाराला लागणारा पैसा कुठून येतो ?’, हे मलाच कळत नाही. आपल्‍याला जे आवश्‍यक आहे, ते सर्व गुरुमाऊलीच पुरवतात. त्‍यामुळे या जन्‍मी मी आपला देवाण-घेवाण हिशोब फेडत आहे. तुला होणारा शारीरिक त्रास तू सहन करतेस.

सौ. नम्रता : गुरुमाऊलीच (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) मला सहनशक्‍ती देते.

हे सर्व विचार आम्‍हाला गुरुमाऊलीच देत आहेत आणि बळही तेच देत आहेत. ‘आमचे जीवन सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपाशीर्वादाने सार्थकी लागत आहे’, याबद्दल आम्‍ही त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञ आहोत.’

– श्री. नंदकिशोर ठाकूर, ठाणे (१७.८.२०२३)

सातत्‍याने भावावस्‍थेत रहाणार्‍या सौ. नम्रता ठाकूर !

१. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव असणे

‘एकदा सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांनी माझी पत्नी सौ. नम्रता ठाकूर हिला सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र दिले. तेव्‍हा मी तिला विचारले, ‘‘हे छायाचित्र तुझ्‍या उशाशी ठेवू कि कुठे लावू ?’’ तेव्‍हा ती म्‍हणाली, ‘‘हे माझ्‍या हृदयात आहेत.’’

२. भवसागरातून भावसागरात स्‍थिर रहाणे‘गुरुकृपा म्‍हणजे काय ? ती झाल्‍यावर काय होते ?’, हे मी माझी पत्नी सौ. नम्रता ठाकूर हिच्‍याकडून शिकत आहे. ‘भवसागरातून भावसागरात स्‍थिर रहाणे, सातत्‍याने भावावस्‍था साध्‍य करणे’, हे केवळ गुरुकृपेने होऊ शकते. तिच्‍या भावावस्‍थेमुळे आम्‍ही सर्व कुटुंबीय आनंद अनुभवत आहोत. श्री गुरुमाऊलींच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

(हे लिखाण सौ. नम्रता ठाकूर यांच्‍या निधनापूर्वीचे आहे.)

– श्री. नंदकिशोर ठाकूर, ठाणे. (१८.९.२०२३)

पत्नीच्‍या उपचारासाठी औदुंबराच्‍या झाडाचे एक पान तोडतांना प्रार्थना करणे

‘आमच्‍या अंगणात एक औदुंबराचे झाड आहे. त्‍याचे एक पान तोडतांना मी प्रार्थना करतो, ‘हे दत्तगुरु, गुरुमाऊली, आपल्‍या झाडाचे एक पान माझ्‍या पत्नीच्‍या उपचारासाठी घेत आहे. तुम्‍हीच तिला ऊर्जा द्या.’’ त्‍यानंतर मी ते पान माझ्‍या पत्नीच्‍या मस्‍तकावर ठेवतो. हे सर्व गुरुमाऊलींनी प्रेरणा देऊन करवून घेतले. त्‍यासाठी गुरुचरणी कृतज्ञता.’

– श्री. नंदकिशोर ठाकूर, ठाणे. (१८.९.२०२३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक