Ganesh Visarjan : श्री गणेशमूर्तीचे कृत्रिम हौदांऐवजी पारंपरिक पद्धतीने विसर्जन करा !

‘गणेशोत्‍सव, नवरात्रोत्‍सव, दिवाळी, रंगपंचमी या सण-उत्‍सवांच्‍या वेळी प्रदूषण होते’, अशी एक धारणा जाणीवपूर्वक समाजात निर्माण करण्‍यात आली आहे. याच्‍याशी निधर्मी सरकार आणि प्रशासनही १०० टक्‍के सहमत आहे. हे त्‍यांच्‍या वर्षभर राबवण्‍यात येणार्‍या मोहिमा, जागृती अभियान, विविध अहवालांचे प्रकाशन, विविध कृती कार्यक्रम यांतून स्‍पष्‍ट होते, तर दुसरीकडे बकरी ईदच्‍या वेळी लाखो प्राण्‍यांची होणारी कत्तल असो, ताबूतांचे विसर्जन असो, मशिदींवरील दिवसांतून ५ वेळा वाजणारे भोंगे असोत वा ख्रिस्‍ती नववर्षानिमित्त होणारी फटाक्‍यांची प्रचंड आतीषबाजीद्वारे केलेली मौजमजा असो, यांच्‍यामुळे प्रदूषण होत नाही किंवा किंबहुना या दृष्‍टीने यांकडे पाहिलेच जात नाही. त्‍यामुळे त्‍याविषयी कुणीच चकार शब्‍द काढत नाही, हे दुर्दैवी आहे. गणेशोत्‍सव आल्‍यावर ‘गणपति विसर्जनामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते’, अशी खोटी माहिती देऊन समाजाची दिशाभूल केली जात आहे. गेली काही वर्षे कृत्रिम हौदाची संकल्‍पना संपूर्ण महाराष्‍ट्रात न्‍यून-अधिक प्रमाणात राबवली जात आहे. असे असतांना वास्‍तवता दर्शवणार्‍या काही गोष्‍टी या लेखात देत आहे. (Ganeshotsav, Ganesh, Ganpati, Ganesh Visarjan)

संकलक : श्री. सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती.

१. प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसच्‍या गणेशमूर्ती प्रदूषणकारी नाहीत !

सर्वप्रथम हे लक्षात घ्‍यायला हवे की, ‘प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसच्‍या (‘पीओपी’च्‍या) गणेशमूर्तींमुळे कोणतेही प्रदूषण होत नाही’, असे अनेक वैज्ञानिक अहवालातून स्‍पष्‍ट झाले आहे. ‘जिप्‍सम’ नावाच्‍या खडकातील पाण्‍याचा अंश बाहेर काढला की, त्‍याची जी पावडर बनते, त्‍याला ‘प्‍लास्‍टर ऑफ पॅरिस’ किंवा ‘कॅल्‍शियम सल्‍फेट’ असे म्‍हणतात. हा पदार्थ अल्‍कली नाही, तसेच अ‍ॅसिडिकही नाही, तर तो न्‍यूट्रल (निश्‍चित गुणधर्म नसलेला) आहे. तो औषधातही वापरला जातो. एवढेच नव्‍हे, तर पाणी शुद्धीकरण प्रक्रियेतही त्‍याचा वापर होतो. ‘पीओपी’ संथ पाण्‍यात विरघळायला दीड ते दोन मास लागतात. नदीच्‍या पाण्‍यात ७ ते ८ दिवसांत तो विरघळतो. विरघळल्‍यावर त्‍याची मातीच बनते. ती माती वाळवल्‍यावर त्‍याला पुन्‍हा घट्टपणा वा चिकटपणा रहात नाही. त्‍यामुळे ‘पीओपी’मुळे पाण्‍याचे झरे बंद होण्‍याचा प्रश्‍नच उद़्‍भवत नाही. ही वैज्ञानिक तथा शास्‍त्रीय माहिती अनेक संकेतस्‍थळांवर, तसेच ‘गूगल केमिस्‍ट्री’वरही पाहू शकतो.

२. गणेशमूर्ती विसर्जनामुळे होणारे प्रदूषण अत्‍यंत नगण्‍य

श्री. सुनील घनवट

महाराष्‍ट्रातील २७ महानगरपालिका, २३८ नगरपालिका, १३१ नगर पंचायती, ७ कॅन्‍टोन्‍मेंट बोर्ड यांद्वारे ५० टक्‍क्‍यांहून अधिक मैला, घनकचरा थेट नदी वा नैसर्गिक जलस्रोतात सोडला जातो. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या अहवालानुसार वर्ष २०२०-२१ मध्‍ये महाराष्‍ट्रात प्रतिदिन निर्माण होणार्‍या २२ सहस्र ६३२ टन घनकचर्‍यापैकी केवळ १५ सहस्र टन घनकचर्‍यावर प्रक्रिया केली जाते. अर्थात् जवळजवळ प्रतिदिन ७ सहस्र टन अत्‍यंत प्रदूषणकारी घनकचरा कुठलीही प्रक्रिया न करता नैसर्गिक जलस्रोतामध्‍ये सोडला जातो. त्‍यातून किती भयंकर प्रदूषण होत असेल, याची कल्‍पनाही करता येत नाही. त्‍या तुलनेत वर्षातून एकदा येणार्‍या सर्व गणेशमूर्तींचे एकत्रित वजन निश्‍चितच न्‍यून असेल.

थोडक्‍यात गणेशमूर्ती विसर्जनामुळे नैसर्गिक जलस्रोतात जाणारी माती आणि रंग अत्‍यंत नगण्‍य असून त्‍याचा पर्यावरणाच्‍या दृष्‍टीने विचार करण्‍याची आवश्‍यकता नाही. या मूर्तींवरील रासायनिक रंगांमुळे जे अत्‍यल्‍प प्रदूषण होते, ते थांबवण्‍यासाठी शासनाने रासायनिक रंगांच्‍या जागी नैसर्गिक रंगांनी मूर्ती रंगवण्‍याची सक्‍ती केल्‍यास तेही थांबू शकेल. वर्ष २००८ मध्‍ये पुणे महानगरपालिकेच्‍या तत्‍कालीन आयुक्‍तांनी म्‍हटले होते, ‘‘गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण वगैरे होत नाही आणि होत असले, तरी ते अगदी नगण्‍य आहे.’’

३. कृत्रिम हौदांविषयी विविध महानगरपालिका आणि स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था करत असलेली कार्यवाही

३ अ. कृत्रिम हौदातील गणेमूर्तींचे विसर्जन पुन्‍हा नैसर्गिक जलस्रोतातच; मग कृत्रिम हौदाचा पांढरा हत्ती कशासाठी ? : गणेशमूर्ती कृत्रिम हौदात पूर्णपणे विरघळत नसल्‍याने त्‍याचे पुनर्विसर्जन करावेच लागते. हे करतांना ज्‍या समुद्र, नदी वा नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्‍यास बंदी घातली जाते, तेथेच रात्रीच्‍या वेळी गुपचूप विसर्जन केले जाते, असे अनेकदा उघड झाले आहे. अनेक प्रसिद्धीमाध्‍यमांनीही याचा छायाचित्रांसह भांडाफोड केला आहे. सरकारने याची वस्‍तूनिष्‍ठ माहिती घेतल्‍यास याचे भीषण सत्‍य समोर येईल.

जर गणेशमूर्तींचे नदी, तलाव, समुद्र वा नैसर्गिक जलस्रोतातच विसर्जन करायचे होते, तर कृत्रिम हौदाचा पांढरा हत्ती कशासाठी पोसायचा ? राज्‍यातील अनेक महापालिका आणि नगरपालिका कृत्रिम हौदासाठी लाखो ते कोट्यवधी रुपये प्रतिवर्षी व्‍यय करत आहेत. त्‍यासाठी विज्ञापने, पत्रके, फलक यांचा खर्च वेगळा. हा जनतेच्‍या पैशाचा अपव्‍यय नाही का ? याचा सरकारने वस्‍तूनिष्‍ठपणे अभ्‍यास करून हे अशास्‍त्रीय कृत्रिम हौद कायमचे बंद करायला हवेत.

३ आ. घनकचरा विभागाच्‍या गाड्यांतून गणेशमूर्तींची होणारी वाहतूक ही श्री गणेशाची घोर विटंबना ! : महापालिका आणि नगरपालिका या ‘कृत्रिम हौदात विसर्जित झालेल्‍या गणेशमूर्तींची वाहतूक घनकचरा विभागाच्‍या डंपरमधून केली जाते’, अशी माहिती माहिती अधिकारात मिळालेली आहे. अशा गलिच्‍छ आणि दुर्गंधयुक्‍त कचर्‍याच्‍या गाडीतून श्री गणेशाची वाहतूक करणारे प्रशासकीय अधिकारी स्‍वत: या गाड्यांमध्‍ये बसून फिरू शकतील का ? नाही. मग अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री गणेशाची वाहतूक कचर्‍याच्‍या गाडीतून करणे, हे महापाप असून हिंदूंच्‍या धार्मिक भावना आणि धर्मश्रद्धा दुखावणारे आहे. तरी अशा प्रकारे होणारी श्री गणेशाची घोर विटंबना सरकारने तातडीने थांबवायला हवी.

३ इ. कृत्रिम हौदातील गणेशमूर्तींची पुनर्विसर्जनाच्‍या वेळी होणारी विटंबना थांबवा ! : सर्वांत महत्त्वाचे, म्‍हणजे ‘कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्‍या गणेशमूर्तींच्‍या पुनर्विसर्जनासाठी प्रशासनाची कोणतीही ठोस कार्यपद्धत वा धोरण ठरलेले नाही’, असे माहितीच्‍या अधिकारात उघड झाले आहे. परिणामी कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्‍या गणेशमूर्तींची मोठ्या प्रमाणावर विटंबना होत आहे. यात कुठल्‍याही प्रकारे गणेशमूर्तीचे पावित्र्य राखले जात नाही. कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्‍या गणेशमूर्ती काढण्‍यासाठी जेव्‍हा शासकीय कर्मचारी त्‍यात उतरतात, तेव्‍हा त्‍यांच्‍या पायाखाली अनेक गणेशमूर्ती येऊन त्‍यांचे अवयव भंग होऊन त्‍यांची विटंबना होते. हे अत्‍यंत गंभीर असून हिंदूंच्‍या धर्मश्रद्धा दुखावणारे आहे. तसेच कृत्रिम हौदात विसर्जित गणेशमूर्ती दगडांच्‍या खाणीमध्‍ये पुनर्विसर्जन करण्‍याची वा मूर्तींचा चुरा करण्‍याची वा मातीत गाडण्‍याच्‍या ज्‍या संकल्‍पना होत्‍या, त्‍यालाही मोठ्या प्रमाणात विरोध झाल्‍यामुळे त्‍या योजना बारगळल्‍या आहेत. त्‍यामुळे गणेशमूर्तींचे पावित्र्य राखणे आणि नागरिकांच्‍या धर्मभावना न दुखावता हे सर्व करणे आवश्‍यक आहे.

४. विसर्जित केलेल्‍या गणेशमूर्तींमुळे समाजाला सर्वदूर चैतन्‍य मिळते !

कृत्रिम हौदातून गणेशमूर्ती काढतांना त्‍यांचे पावित्र्य राखले जात नाही, यावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, काही अधार्मिक आणि प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी असे ‘तत्त्वज्ञान’ मांडतात की, गणेशमूर्तीमध्‍ये प्राणप्रतिष्‍ठापना केली की, प्राण येतात आणि उत्तरपूजा झाल्‍यावर प्राण निघून जातात. त्‍यामुळे ती मातीच रहाते. तिचे काही केले तरी चालते. धर्म न मानणारी, देवतांचे अस्‍तित्‍व, मंत्रांचे सामर्थ्‍य न मानणारी माणसे ‘प्राणप्रतिष्‍ठापना’ आणि ‘प्राण निघून जाणे’, या संकल्‍पना येथे मात्र मान्‍य करतात. शास्‍त्रात ‘वहात्‍या पाण्‍यात मूर्तीविसर्जनामुळे मूर्तीतील चैतन्‍य सर्वदूर पसरते, याचा समाजाला लाभ होतो’, असे सांगितले आहे. ही धार्मिक कृती असल्‍याने ती तशी करणे, हे क्रमप्राप्‍त आहे. त्‍यात पालट करायचा असेल, तर तो शास्‍त्रातील तज्ञ अधिकारी व्‍यक्‍तीच (उदा. शंकराचार्य, संत) सांगू शकतात.

गणेशमूर्तींच्‍या वहात्‍या पाण्‍यातील परंपरागत विसर्जनाला अनेक पर्यावरणवादी आणि प्रशासन हे विरोध करून बलपूर्वक गणेशमूर्तींचे दान वा त्‍या कृत्रिम हौदात विसर्जन करण्‍यास गणेशभक्‍तांना भाग पाडले जात आहे. ही बळजोरी सरकारने तात्‍काळ थांबवी.

सरकारकडे गणेशभक्‍तांच्‍या मागण्‍या

१. शास्‍त्रानुसार श्री गणेशमूर्ती विसर्जन हे वहात्‍या पाण्‍यात करण्‍यासाठी गणेशभक्‍तांना आडकाठी आणू नये.

२. सरकारने अशास्‍त्रीय कृत्रिम हौदातील विर्सजन ही अघोरी प्रथा तात्‍काळ बंद करावी.

३. प्रशासन वा अंनिसवाले यांना कुणालाही मूर्तीदान स्‍वीकारण्‍याचा अधिकार नाही. त्‍यामुळे ती पद्धत बंद करावी.

४. गणेशमूर्ती विसर्जनाविषयी वर्ष २०१० च्‍या ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्‍या सूचनेनुसार ‘गणेशमूर्ती विसर्जनासाठी जलाशय वा तलाव यांमध्‍ये एका कोपर्‍याला लोखंडी तारेच्‍या जाळीने बांधलेली दगडी भिंत सिद्ध करून त्‍या ठिकाणी गणेशभक्‍तांना गणेशमूर्ती विसर्जन करण्‍यास सांगावे.’

५. कागदी लगद्यामुळे पाण्‍यातील ऑक्सिजन नष्‍ट होऊन जलचर प्राणी आणि वनस्‍पती यांच्‍यावर गंभीर परिणाम होत आहे. त्‍यामुळे पर्यावरण रक्षणासाठी प्रदूषणकारी कागदी लगद्याच्‍या मूर्ती घेऊ नयेत, असे आवाहन सरकारने नागरिकांना करावे.

– श्री. सुनील घनवट

गणेशभक्‍तांनो, कागदी लगद्याद्वारे बनवलेल्‍या गणेशमूर्तीचे वास्‍तव जाणा !

१० किलोच्‍या कागदी लगद्यापासून बनवलेल्‍या गणेशमूर्तीमुळे १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित होत असल्‍याचे मुंबईतील ‘रसायन तंत्रज्ञान संस्‍था’ या प्रसिद्ध शासकीय संस्‍थेने प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे. तसेच एका अभ्‍यासात कागदी लगद्यामुळे पाण्‍यातील ऑक्सिजन नष्‍ट होऊन जलचर प्राणी आणि वनस्‍पती यांच्‍यावर गंभीर परिणाम होत असल्‍याचे पुढे आले आहे. परिणामी या संदर्भात प्रविष्‍ट झालेल्‍या जनहित याचिकेवर पुणे येथील ‘राष्‍ट्रीय हरित लवादा’ने ३०.९.२०१६ या दिवशीच्‍या आदेशाद्वारे कागदी लगद्याद्वारे गणेशमूर्ती बनवण्‍यासंदर्भातील शासन निर्णयावर स्‍थगिती आणली आहे.

– श्री. सुनील घनवट

संपादकीय भूमिका 

गणेशमूर्ती विसर्जनावरून आगपाखड करणारे पर्यावरणप्रेमी नदीत विनाप्रक्रिया सांडपाणी सोडले जाते, याविषयी ‘ब्र’ही काढत नाहीत !