प्रदूषणाच्‍या नावाखाली गणेशोत्‍सवच नव्‍हे, तर अनेक सण-उत्‍सवांवर बंधने आणण्‍याचे षड्‍यंत्र ! – अधिवक्‍ता सतीश देशपांडे, इतिहास आणि संस्‍कृती अभ्‍यासक

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘गणेशोत्‍सवामुळे जलप्रदूषण होते का ?’

अधिवक्ता सतीश देशपांडे

मुंबई – पशूवधगृहे आणि कारखाने यांमुळे प्रदूषण होते, हे गोदावरी, यमुना आदी अनेक नद्यांविषयी सरकारनेच दिलेल्‍या अहवालांतून स्‍पष्‍ट झाले आहे; मात्र ‘गणेशोत्‍सवामुळे प्रदूषण होते’, याची अधिकृत माहिती वा आकडेवारी कुणाकडेही नाही. मग गणेशमूर्तींच्‍या विसर्जनामुळे प्रदूषण होते, हे कोणत्‍या आधारावर म्‍हटले जात आहे ? गणेशोत्‍सवच नव्‍हे, तर हिंदूंच्‍या सर्व सण-उत्‍सवांवर विविध बंधने आणायचे षड्‍यंत्र आहे. गणेशमूर्तींच्‍या विसर्जनामुळे प्रदूषण होत नाही, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे. हिंदूंनी याविषयी आवाज उठवून जागृती केली पाहिजे, असे आवाहन इतिहास आणि संस्‍कृती अभ्‍यासक अधिवक्‍ता सतीश देशपांडे यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘गणेशोत्‍सवामुळे जलप्रदूषण होते का ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्‍या विशेष संवादात बोलत होेते.

कारखाने, पशूवधगृहे यांच्‍यामुळे होणार्‍या प्रदूषणाविषयी कथित विज्ञानवाद्यांनी कोणते प्रयत्न केले ? – श्री. सतीश कोचरेकर, मुंबई प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. सतीश कोचरेकर

‘गणेशोत्‍सवात प्रदूषण होते’, असा भ्रम नागरिकांमध्‍ये तथाकथित पर्यावरणवादी, विज्ञानवादी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले निर्माण करत आहेत. महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मार्च २०२३ मध्‍ये घोषित केलेल्‍या पुस्‍तिकेत सर्वांत हानीकारक प्रदूषित नद्यांमध्‍ये मुंबईतील मिठी नदी, नागपूरमधील कन्‍हान नदी, पुण्‍यातील मुळा-मुठा नद्या यांचा उल्लेख केला होता. मार्चमध्‍ये तर गणेशोत्‍सवही नव्‍हता, तर मग हे कोणते प्रदूषण होते ? कारखाने, पशूवधगृहे यांच्‍यामुळे वर्षभर होणार्‍या प्रदूषणाविषयी विज्ञानवादी, सेलिब्रिटी मात्र आवाज उठवत नाहीत. हे प्रदूषण रोखण्‍यासाठी त्‍यांनी काही प्रयत्न केले आहेत का ? ‘गेल्‍या १० वर्षांत कृत्रिम हौद बनवल्‍याने प्रदूषण न्‍यून झाले आहे’, असे सरकार आकडेवारीसह घोषित करील का ? हिंदूंचा गणेशोत्‍सव आणि अन्‍य कोणताही सण प्रदूषण निर्माण करत नाहीत, तर ते जीवनात ज्ञान अन् आनंद यांची वृद्धी करतात. ‘गणेशोत्‍सव आणि हिंदूंच्‍या सण-उत्‍सवांत प्रदूषण होते’, या भ्रमातून हिंदूंनी बाहेर येऊन स्‍वतःचे सण-उत्‍सव साजरे करावेत.

गणेशमूर्ती वहात्‍या पाण्‍यात विसर्जनाला प्रशासन कुठल्‍या आधारे विरोध करत आहे ? – दीपक देसाई, कोल्‍हापूर जिल्‍हाध्‍यक्ष, हिंदू एकता आंदोलन

श्री. दीपक देसाई

वहात्‍या पाण्‍यामध्‍ये गणेशमूर्तीचे विसर्जन केले पाहिजे, अशी हिंदु धर्मात परंपरा आहे; मात्र गणेशमूर्तींचे तसे विसर्जन करण्‍यास पोलीस-प्रशासनाकड़ून विरोध केला जातो आणि हा विरोध कुठल्‍या आधारे केला जातो? तसेच न्‍यायालयाच्‍या कोणत्‍या आदेशानुसार असे केले जाते ? याविषयी पोलीस-प्रशासनाकडे योग्‍य उत्तर नाही. कोल्‍हापूर येथील पंचगंगा नदीमध्‍ये ६ नाल्‍यांचे आणि कारखान्‍यांचे पाणी सोडले जाते, याकडे प्रशासनाचे लक्ष नाही; मात्र गणेशोत्‍सव आला की, हे प्रदूषणाच्‍या नावाखाली जागे होतात. हिंदूंच्‍या प्रथा-परंपरा बंद करण्‍यासाठी हे सर्व केले जात आहे, असे यातून दिसते.