पट्टेरी वाघाचे कातडे आणि नखांची तस्करी करणार्‍या महाबळेश्वरच्या ३ जणांना अटक

सातारा, २४ सप्टेंबर (वार्ता.) – पट्टेरी वाघाचे कातडे आणि नख यांची तस्करी करणार्‍या महाबळेश्वर येथील ३ जणांना मुंबई (बोरिवली) पोलिसांनी अटक केली आहे. मोहसीन जुंद्रे, मंजूर मानकर आणि सुरज कारंडे अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.

संशयितांकडून वाघाचे सोलून काढलेले काळ्या पिवळ्या रंगाचे पट्टे असलेले ११४ सें.मी. लांब, १०८ सें.मी. रुंद वाघाचे कातडे आणि १२ वाघनखे असा १० लाख ६० सहस्र रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. संशयितांवर वन्यजीव संरक्षण कायदा अधिनियम १९७२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी कराड येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी असलेल्या स्टार कासवाची तस्करी करणारी टोळी पोलिसांनी पकडली होती.

महाबळेश्वरच्या जंगलात पट्टेरी वाघ आहेत का ? असतील तर नेमकी त्यांची शिकार कुणी केली ? राष्ट्रीय प्राणी पट्टेरी वाघाच्या कातड्याची आणि नखांची तस्करी होत असतांना वनविभागाचे अधिकारी अन् कर्मचारी अनभिज्ञ कसे ? याविषयी उलट-सुलट चर्चा चालू आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर तरी निद्रिस्त असलेला सातारा वनविभाग जागा होणार का ? असा प्रश्न सातारा जिल्हावासियांना पडला आहे.