(गोवा) अनेक हेक्टर भूमी लुटली : भूमी लुटण्यामध्ये सरकारी अधिकार्‍यांचा हात असल्याचा अन्वेषण अधिकार्‍यांचा दावा

बनावट कागदपत्रांद्वारे भूमी बळकावल्याची दक्षिण गोव्यात एका दशकात अनेक प्रकरणे

पणजी, १८ मे (वार्ता.) – दक्षिण गोव्यात बनावट कागदपत्रे सिद्ध करून भूमी बळकावल्याच्या अनेक घटना गेल्या एका दशकात घडल्या आहेत. याद्वारे अनेक हेक्टर भूमी बळकावण्यात आली आहे. या प्रकरणांत मोठ्या प्रमाणावर पैशांचा व्यवहार झाला आहे. मामलेदार कार्यालयापासून ते उप-प्रबंधक (सब रजिस्ट्रार) कार्यालयापर्यंत संबंधित कर्मचारी किंवा अधिकारी यांनी भूमी बळकावण्यास साहाय्य केले आहे.

भूमी बळकावल्याच्या प्रकरणी सरकारस्थापित अन्वेषण अधिकारी तथा पोलीस निरीक्षक सूरज सावंत म्हणाले, ‘‘भूमी बळकावल्याच्या प्रकरणी भूमीची ‘पावर ऑफ अटर्नी’ (मुखत्यारपत्र) दिलेली व्यक्ती जिवंत आहे कि नाही ? याची पडताळणी न करताच मामलेदार कार्यालयात भूमींची ‘म्युटेशन’ (भूमीच्या मालकी हक्कात पालट करणे) प्रक्रिया करण्यात आली आहे. हा एक धक्कादायक प्रकार आहे.’’

१. सरकारस्थापित विशेष अन्वेषण पथकाने केलेल्या अन्वेषणानुसार सासष्टी तालुक्यात एकूण ७ गावांमध्ये भूमी बळकावल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. यामध्ये बनावट व्यक्तींची नावे आणि बनावट कागदपत्रे यांच्या आधारे भूमी बळकावण्यात आल्या आहेत. बनावट कागदपत्रे पाहून संबंधित मामलेदारांनी संमती दिली आहे. सरकारी कार्यालयातून ‘म्यूटेशन’च्या १२ धारिका गहाळ झाल्या आहेत.

२. भूमी बळकावल्याच्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथक अन्वेषण करत असलेल्या एका प्रकरणात संशयिताने वारसा पत्र, विक्री खत, भाडेपट्टी खरेदी प्रमाणपत्र, कौटुंबिक विभाजन आणि इतर खोटी कागदपत्रे खरी असल्याचे भासवून ती विभाजन प्रक्रिया करण्यासाठी सासष्टी तालुक्यातील मामलेदार किंवा संयुक्त मामलेदार कार्यालयात सुपुर्द केली. संशयिताने याद्वारे तालुक्यातील ७ गावांमध्ये एक चौदा उतार्‍यात आपली नावे समाविष्ट करून घेतली.

३. भूमी बळकावल्याच्या प्रकरणातील म्होरक्या फ्लॉयड कुतिन्हो सध्या विदेशात आहे. यासंबंधी बहुतांश प्रकरणे मडगाव आणि फातोर्डा पोलीस ठाण्यांशी निगडित आहेत.

४. विशेष अन्वेषण पथकाने यापूर्वी केलेल्या अन्वेषणातून भूमी बळकावल्याच्या प्रकरणी बार्देश तालुक्याच्या मामलेदारांचा अनेक प्रकरणांमध्ये हात असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मामलेदार राहुल देसाई यांना कह्यात घेण्यात आले होते. यानंतर पुरातत्व विभाग आणि अन्य खात्यांतील कर्मचारी यांना कह्यात घेण्यात आले होते. दक्षिण गोव्यातील भूमी बळकावल्याच्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथक आता कुणावर कारवाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

संपादकीय भूमिका

भूमी बळकावल्याच्या प्रकरणांतील सरकारी अधिकार्‍यांवर कठोरातील कठोर कारवाई झाली, तरच पुन्हा कुणीही भ्रष्टाचार करण्यास धजावणार नाही !