(म्हणे) ‘बौद्ध मंदिर पाडून तिरुपती मंदिराची निर्मिती झाली आहे !

कर्नाटकातील अभिनेते चेतन यांचा ‘शोध’ !

डावीकडे अभिनेते चेतन

बेंगळुरू (कर्नाटक) – बौद्ध मंदिर पाडून तेथे तिरुपती देवस्थान बांधण्यात आले आहे, असे विधान कर्नाटकातील अभिनेते चेतन यांनी यू ट्यूबवरील एका मुलाखातीत केले. या विधानावरून हिंदूंकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अभिनेते चेतन यांनी म्हटले की,

१. ‘तिरुपती हे मूलतः बौद्ध मंदिर होते’, असे मत के. जमुनादास यांनी ‘तिरुपती बालाजी मूलतः बौद्ध मंदिर’ (१४ एप्रिल २००१) या त्यांच्या पुस्तकात व्यक्त केले आहे. इतिहासकार म्हणतात की, वैदिक संस्कृतीची देवालये कधीच नव्हती. बौद्धांच्या कह्यातून ती घेण्यात आली. (‘खोटे बोल; पण रेटून बोल’ अशा वृत्तीचे अभिनेते चेतन !  – संपादक)

२. कर्नाटकाला भाजपचेे हिंदुत्व नाही, तर पेरियार आणि डॉ. आंबेडकर यांच्या सिद्धांताची आवश्यकता आहे. (कुणाला कोणत्या सिद्धांताची आवश्यकता आहे ?, हे समाज ठरवील, हे चेतन यांनी ठरवू नये ! – संपादक) काँग्रेस, जनता दल (सेक्युलर) आणि आम आदमी पक्ष यांचे राजकीय हिंदुत्वही नको आहे. देशातील कोणताच पक्ष परिवर्तनाचा सिद्धांत मांडत नाही.

३. लोकशाहीत सत्य सांगण्याचा अधिकार आहे. मला जाणवलेले सत्य मी सांगू शकतो. मी पुराव्यांसह बोलत आहे. तुमच्याकडे पुरावे असतील, तर द्या. श्रीराम नावाची व्यक्ती  होती, ती येथे जन्माला आली होती, हे सिद्ध करा. (अन्य धर्मियांना अशा प्रकारचे आव्हान देण्याचे धाडस अभिनेते चेतन दाखवतील का ? – संपादक)

४. खरे सांगायचे, तर ही देवस्थाने पूर्वी बौद्ध विहारच होती. वैदिक काळ, म्हणजे ख्रिस्तपूर्व १ सहस्र ५०० ते ख्रिस्तपूर्व ५०० च्या मधला काळ. त्यानंतर बुद्ध होते. वैदिक काळात होम-हवन, यज्ञ सर्व होते; परंतु देवस्थाने, मंदिरे नव्हती. बुद्धानंतर, अशोक झाल्यानंतर बौद्ध धर्म पसरल्यानंतर बौद्ध स्तुप आणि विहार आले. त्यानंतर पुन्हा ब्राह्मण, वैदिक परंपरा आल्यावर ८४ सहस्र बौद्ध विहार फोडून त्यांची हिंदु मंदिरे करण्यात आली. बौद्ध भिक्षुंना मारून टाकून बौद्ध विहारांना वैदिक मंदिरे बनवण्यात आले, असे म्हणतात. तोपर्यंत देवस्थाने नव्हती; कारण वैदिक परंपरेत होम-हवन असते, याला पुरावे आहेत. त्याच्यासाठी हवे ते पुरावे देतो. (अशा प्रकारची हास्यस्पद विधाने करून त्यांचे पुरावे देणार्‍यांनी बौद्ध धर्म भारतातून संपुष्टात का आला ?, याचा आधी विचार करावा. – संपादक)

५. प्रामुख्याने तिरुपती, केदारनाथ देवस्थाने अशाच रीतीने मंदिरे बांधली आहेत. तिरुपती देवस्थान आधी बौद्ध मंदिर होते. ऐतिहासिक पुरावे सांगतात की, ८४ सहस्र बुद्ध विहार आहेत. ते सर्व राजा अशोक आणि त्याच्या नंतर असलेल्यांनी बांधले.

 संपादकीय भूमिका 

या शोधासाठी चेतन यांना पुरस्कारच द्यायला हवा !