विवाह न जुळण्यातील अडथळे आणि उपाययोजना !

हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कुणी कुटुंबातील मृत व्यक्तीचे श्राद्ध-पक्ष करत नाही, तसेच साधनाही करत नसल्याने बहुतेक सर्वांनाच पूर्वजांच्या लिंगदेहांमुळे त्रास होतो. पूर्वजांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे किंवा त्रास होत आहे, हे उन्नतच सांगू शकतात. तसे सांगणारे उन्नत न भेटल्यास पुढे दिल्याप्रमाणे काही तर्‍हेचे त्रास पूर्वजांमुळे होतात असे समजावे – विवाह न होणे, विवाह झाल्यास पतीपत्नीचे न जुळणे, जुळल्यास गर्भधारणा न होणे, गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, गर्भपात न झाल्यास मूल वेळेआधी जन्मणे, मतीमंद किंवा विकलांग अपत्य होणे, अपत्ये बालपणातच मृत्यूमुखी पडणे वगैरे. दारिद्र्य, शारीरिक आजार अशीही लक्षणे असू शकतात.

१. कोणत्याही तर्‍हेचा त्रास होत नसल्यास पुढे त्रास होऊ नये म्हणून, तसेच जरासा त्रास असल्यास कमीतकमी १ ते २ घंटे (तास) किंवा ३ घंटे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा जप नेहमीच करावा. एरव्ही प्रारब्धामुळे त्रास होऊ नये, तसेच आध्यात्मिक उन्नती व्हावी, म्हणून सर्वसामान्य मनुष्याने किंवा प्राथमिक अवस्थेतील साधकाने आपल्या कुलदेवतेचा नामजप जास्तीतजास्त करावा.

२. मध्यम तर्‍हेचा त्रास असल्यास कुलदेवतेच्या जपासमवेतच ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा जप कमीतकमी २ ते ४ घंटे तरी करावा, तसेच गुरुवारी दत्ताच्या देवळात जाऊन ७ प्रदक्षिणा घालाव्यात आणि बसून एक-दोन माळा जप वर्षभर तरी करावा. त्यानंतर ३ माळा जप चालू ठेवावा.

३. तीव्र त्रास असल्यास कमीतकमी ४ ते ६ घंटे जप करावा. एखाद्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जाऊन नारायणबली, नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, कालसर्पशांती अशांसारखे विधी करावे. त्याच्याच जोडीला एखाद्या दत्तक्षेत्री राहून साधना करावी किंवा संतसेवा करून त्यांचा आशीर्वाद मिळवावा.

(संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दत्त’)