विवाहसंस्काराचे महत्त्व !

हिंदु धर्मात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. त्यांपैकी ‘काम’ हा पुरुषार्थ साध्य करून हळूहळू ‘मोक्ष’ या पुरुषार्थाकडे जाता यावे, यासाठी विवाहसंस्काराचे प्रयोजन आहे.

स्त्री-पुरुषांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी विवाहाशी संबंधित असतात, उदा. स्त्री-पुरुष यांच्यामधील प्रेम, विवाहसंस्कार शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा त्यांच्यातील संबंध, संतती, जीवनातील अन्य सुखे, समाजातील स्थान आणि जीवनातील उन्नती !

विवाह सोहळ्याकडे ‘समारंभ’ म्हणून नव्हे, तर ‘धार्मिक संस्कार’ म्हणून पहा !

‘आजकाल विवाह सोहळा हा एक मौजमजेचा कार्यक्रम असल्याचे हिंदूंना वाटते. त्यामुळे विवाहाचे विधी होत असतांना विवाहाला आलेली माणसे गप्पागोष्टी करत असतात, तसेच तेव्हा गाणी लावलेली असतात आणि अधूनमधून ‘बँड’ही वाजत असतो. या गोंगाटामुळे धार्मिक विधीमुळे निर्माण होणारी सात्त्विकता टिकून न रहाता घटते. हिंदु धर्मशास्त्रानुसार (धार्मिक पद्धतीने) विवाहविधी केल्यामुळे आणि मंत्रोच्चारांतील सुमधुर नादामुळे अष्टदिशा भारित होतात अन् चैतन्याच्या स्तरावर वधू-वरांना अशीर्वादात्मक बळ प्राप्त करून दिले जाते. हे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेल्या वैज्ञानिक चाचणीद्वारेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विवाह सोहळ्याकडे ‘एक मौजमजेचा कार्यक्रम’ म्हणून न पहाता ‘एक धार्मिक संस्कार’ म्हणून पाहिल्यास त्याचा वधु-वरांना, तसेच विवाहाला आलेल्या मंडळींनाही लाभ होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कुठे पाश्चात्त्य विवाह तर कुठे हिंदु विवाह !

१. पाश्चात्त्य विवाह : ‘हा केवळ शारीरिक स्तरावरचा असतो; म्हणून त्यामुळे पती-पत्नीला एकमेकांचा मानसिक आधार मिळत नाही. त्यामुळे मनावर ताण येऊन त्यांना मनोविकारतज्ञांकडे जावे लागते.

२. हिंदु विवाह : हा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तिन्ही स्तरांवर आधार देणारा आहे. आध्यात्मिक स्तरावर दोघांनी एकमेकांना साहाय्य करून सप्तलोक पार करून मोक्षाला जायचे असते. यासाठीच सप्तपदी असते.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

स्थळ आणि काळ जुळल्यावर विवाह (कोणतीही गोष्ट) निश्चित होणे !

‘एका साधिकेच्या आई-वडिलांनी तिच्या विवाहासंदर्भात एका साधकाला विचारले. त्याने सांगितले, ‘‘सध्या लग्न करायचा विचार नाही.’’ त्याच्या दुसर्‍याच दिवशी एका साधकाने तिला विवाहासंदर्भात विचारले आणि तिचे लग्न ठरले. यातून हे लक्षात येते की, तिच्या विवाहाचा काळ आल्याने त्यासंदर्भात स्थळाशी संबंधित (वराशी संबंधित) घटना घडू लागल्या, म्हणजे स्थळ आणि काळ जुळल्यावर विवाह निश्चित झाला.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले