हिंदु धर्मशास्त्रानुसार (धार्मिक पद्धतीने) विवाहविधी केल्यामुळे वधूवरांना झालेले आध्यात्मिक स्तरावरील लाभ

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘हिंदु धर्माने जीवनात घडणार्‍या प्रमुख सोळा प्रसंगी ईश्वराच्या जवळ जाता यावे, यासाठी करावयाचे ‘सोळा संस्कार’ सांगितले आहेत. त्यांतील सर्वांत महत्त्वाचा संस्कार म्हणजे ‘विवाहसंस्कार’ ! विवाहाचा खरा उद्देश आहे – ‘दोन जिवांचे भावी जीवन एकमेकांना पूरक आणि सुखी होण्यासाठी ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करून घेणे !’ यासाठी धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे विवाहविधी करणे आवश्यक असते. ‘हिंदु धर्मशास्त्रानुसार (धार्मिक पद्धतीने) केलेल्या विवाहविधीमुळे वधू आणि वर यांना आध्यात्मिकदृष्ट्या कोणते लाभ होतात ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी विवाहस्थळी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीतील वधू आणि वर यांच्या विवाहविधीपूर्वी (आदल्या दिवशी ‘हळद लावणे’ या विधीपूर्वी) आणि विवाहविधी झाल्यानंतर ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या.

१ अ. विवाहविधी झाल्यानंतर वधू आणि वर यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे : वधू आणि वर यांच्यामध्ये विवाहविधी आरंभ होण्यापूर्वी अन् विवाहविधी झाल्यानंतरही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. विवाहविधी झाल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

२ अ. ‘विवाह हा ‘शिव आणि शक्ति’ या दोहोंना एकमेकांना अनुरूप बनवणारा एक पवित्र संस्कार असल्याने, मंत्रयुक्त नादाने भारित असणार्‍या वातावरणात विवाहरूपी पवित्र बंधनात अडकून शिव-शक्तीरूपी ऐक्यातून वैराग्याचा महामंत्र घेऊन जीवनाच्या अंती मुक्त होणे, हाच विवाहाचा खरा गर्भीतार्थ आहे.’

(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ – ‘विवाहसंस्कार : शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा’)

२ आ. धार्मिक पद्धतीने विवाह करतांना विवाहदिनी केले जाणारे काही विधी/कृती आणि त्यांचे महत्त्व : ‘मुंडावळ्या बांधणे, अंतःपटधारणविधी, मंगलाष्टके म्हणणे, परस्परनिरीक्षणविधी आणि पुष्पमाळ घालणे, अक्षतारोपणविधी (वधू-वरांवर अक्षता वहाणे), मंगळसूत्रबंधन, सप्तपदी आदी. या सर्वच विधींमागे काही ना काही अध्यात्मशास्त्रीय कारण आहे. त्याचे सूक्ष्म परिणाम वधू आणि वर यांवर होतात. त्यांना देवतांचा आशीर्वाद मिळतो, तसेच चैतन्य मिळते.

२ इ. धार्मिक पद्धतीने केलेल्या विवाहविधीतून वधूवरांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे : वधू आणि वर यांच्यामध्ये विवाहविधीपूर्वीही सकारात्मक ऊर्जा होती. याचे कारण ते दोघेही अनेक वर्षांपासून साधना करत आहेत. त्यामुळे त्यांच्यातील सत्त्वगुणात वाढ झाली आहे. हा विवाह धर्मशास्त्रानुसार झाला आहे. विवाहाचे स्थळ, पुरोहित आदि सात्त्विक होते. वधू आणि वर हे साधक असल्याने विवाहविधी चालू असतांना ते ईश्वराच्या अनुसंधानात होते. विवाहविधीतून प्रक्षेपित झालेल्या सकारात्मक स्पंदनांचा (चैतन्याचा) त्यांना लाभ झाल्याने त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

थोडक्यात, विवाहासाठी इच्छुक असणार्‍या स्त्रीपुरुषांनी हिंदु धर्मशास्त्रानुसारच विवाह करावा; कारण असा विवाहच व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही स्तरांवर लाभदायक ठरतो. हिंदु धर्मात शारीरिक वासनांची पूर्ती करण्यासाठी विवाह विधी सांगितलेला नाही, तर चार पुरुषार्थांपैकी ‘काम’ हा पुरुषार्थ साध्य करून हळूहळू ‘मोक्ष’ या पुरुषार्थाकडे जाता यावे, यासाठी प्रायः विवाहसंस्काराचे प्रयोजन आहे. समाजात सुप्रजा निर्माण होऊन समाजाचे अस्तित्व टिकावे आणि त्याचा उत्कर्ष व्हावा, यांसाठी पवित्र अशा या विवाहसंस्काराची, म्हणजे गृहस्थधर्माची स्थापना झाली आहे. विवाहसंस्थेचे जतन करण्यातच संपूर्ण समाजाचे, पर्यायाने राष्ट्राचे सर्वंकष कल्याण आहे.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (९.८.२०१८)