दंगली रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ यांचे धोरण केंद्र आणि सर्व राज्य सरकारे यांनी लागू करावे ! – समीर लोखंडे, उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हेट स्पीच’चा आरोप हिंदूंवर, मग रामनवमीतील दंगलखोरांवर मौन का ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

श्री. समीर लोखंडे

मुंबई – छत्रपती संभाजीनगर येथील दंगल हे एक षड्यंत्र आहे आणि ‘औरंगाबाद’ नावाला समर्थन करणार्‍यांची विचाराधारा याला उत्तरदायी आहे. औरंगजेबाचा ‘दारुल इस्लाम’ (इस्लामचे शासन) हा उद्देश सफल व्हावा, यासाठी ही धडपड आहे. हिंदूंचे एकत्रीकरण आणि हिंदूंमध्ये याविषयी सामाजिक जागरूकता निर्माण झाली पाहिजे. सध्या चालू असलेल्या दंगली रोखण्यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे धोरण केंद्र आणि सर्व राज्य सरकारे यांनी लागू करावे, असे उद्गार संभाजीनगर येथील भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्री. समीर लोखंडे यांनी काढले. हिंदु जनजागृती समितीने ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या ‘हेट स्पीच’चा आरोप हिंदूंवर, मग रामनवमीतील दंगलखोरांवर मौन का ?’, या विषयावरील विशेष संवादात ते बोलत होते.

दंगलीच्या नियोजनामध्ये इम्तियाज जलील यांचा हात आहे का ? याची चौकशी करा ! – बाबूलाल राठौर, प्रतिनिधी, ‘सुदर्शन न्यूज’

श्री. बाबूलाल राठौर

छत्रपती संभाजीनगर येथील झालेली दंगल ही पूर्वनियोजित होती. दंगल करणार्‍यांकडे मोठ्या प्रमाणावर दगड आणि पेट्रोल बाँब होते. पोलिसांसमोरच त्यांची वाहने जाळूनही पोलिसांनी दंगलखोरांवर साधा लाठीचार्जही केला नाही. दंगलीचे पुरावे पोलिसांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दंगलीत जाळलेली वाहने पंचनामा न करता तेथून हलवली, रस्ते धुवून काढले. एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांना दंगलीची माहिती पोलिसांच्याही आधी कशी मिळाली ? दंगलीच्या नियोजनामध्ये इम्तियाज जलील यांचा हात आहे का ? याची चौकशी झाली पाहिजे. दंगलीनंतर पोलिसांनी पत्रकारांना जळालेल्या वाहनांची छायाचित्रे आणि चित्रीकरण करण्यास का दिले नाही ? सत्य लपवण्याचा प्रयत्न का झाला ? हे प्रश्न गंभीर आहेत.

बंगालमधील दंगलींची ‘एन्.आय.ए.’च्या माध्यमातून चौकशी होणे आवश्यक ! – अनिर्बान नियोगी, भारतीय साधक समाज

श्री. अनिर्बान नियोगी

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तेथील दंगलींना अनुसरून केलेल्या हिंदुविरोधी विधानांमुळे विशेष करून हिंदु समाजाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री या नात्याने विधाने करतांना ती विचारपूर्वक करणे अपेक्षित होते. मुख्यमंत्र्यांच्या विधानांमुळे दंगलखोरांवर कारवाई करण्यास पोलीसदलही घाबरत होते. बंगालमधील दंगलींची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणाच्या (‘एन्.आय.ए.’च्या) माध्यमातून चौकशी होणे आवश्यक आहे.

देशाचे तुकडे करण्यासाठी ‘मिनी (छोटे) पाकिस्तान’ निर्माण करण्याचा प्रयत्न ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. सतीश कोचरेकर

रामनवमीला झालेल्या दंगलींवरून दंगलखोर हे दंगली करण्यासाठी प्रशिक्षित असल्याचे लक्षात येते. स्वतःचे वर्चस्व अबाधित ठेवणे; आपण कसे आक्रमक आहोत, हे दर्शवणे, हिंदू समाज सदोदित भीतीच्या सावटाखाली जगावा, यासाठी धर्मांधांचा हा प्रयत्न आहे. देशाचे तुकडे करण्यासाठी ‘मिनी (छोटी) पाकिस्तान’ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. हिंदूंनी हनुमानाप्रमाणे बलोपासना करणे, ही काळाची आवश्यकता आहे. राज्यघटनेने प्रत्येकाला आत्मरक्षण करण्याचा अधिकार दिला आहे आणि त्याचा उपयोग करावा.