ऊस वाहतूकदारांची ७ कोटींची फसवणूक !

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना ( संग्रहीत छायाचित्र )

सोमेश्वरनगर (बारामती) – या वर्षीच्या साखर हंगामात श्री सोमेश्वर कारखान्याच्या ऊस वाहतूकदारांची ९३ टोळ्यांकडून तब्बल ७ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या माहितीनुसार राज्यात वाहतूकदारांची मुकादमांकडून ४४६ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. यावर उपाय काढण्यासाठी ‘लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस महामंडळा’चे कामकाज गतिमान करावे आणि कामगारांची तातडीने नोंदणी करावी अशी मागणी होत आहे.

ऊस तोडणी कामगार (  प्रतिकात्मक छायायाचित्र )

महाराष्ट्रात कारखाने वाहतूकदारांशी करार करतात. या वाहतूकदारांना मुकादमांकडून ऊस तोडणी कामगारांचा पुरवठा होतो; मात्र सध्या खासगी कारखान्यांची संख्या वाढली तरी कामगारांची संख्या मात्र तेवढीच राहिली आहे. त्यामुळे एका वाहतूकदाराकडून उचल घ्यायची आणि दुसर्‍याच कारखान्यावर जायचे किंवा परागंदा व्हायचे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वाहतूकदार कोट्यवधी रुपयांच्या कर्जाखाली दबले आहेत.

( उजवीकडून ) सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंतो भांगे, माजी खासदार राजू शेट्टी व पदाधिकारी

कामगारांची कारखाना कार्यस्थळावर नोंदणी करावी, ऊस तोडणी कामगारांची मुकादमांकडून होणारी पिळवणूक थांबवावी, त्यांना विमा संरक्षण द्यावे, मुलांना वसतीगृह द्यावे, तसेच १० वर्षे ऊस तोडणार्‍यांना निवृत्ती वेतन द्यावे, अशा मागण्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंतो भांगे यांच्याकडे केल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.