पाकिस्तानची घरवापसी !

पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकला कर्ज देण्याचे अद्यापही मान्य केलेले नाही. या संघटनेकडून पाकिस्तानला काही अटी घातल्या गेल्या आहेत; मात्र त्या सर्वच अटी मान्य करण्यास पाक सिद्ध नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पाकला कर्ज मिळण्याची शक्यता नाही आणि कर्ज मिळाले, तरी त्यातून विशेष काही साध्य होण्याची शक्यताही नाही. याचे कारण यापूर्वीही पाकला या संघटनेकडून सहस्रो कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते; पण ‘त्याचा वापर कुठे करण्यात आला ?’, याचा हिशोब पाकने दिलेला नाही. यापूर्वी घेतलेल्या कर्जावरील व्याज फेडण्यासाठीही पाककडे पैसे नाहीत. पाकचा विदेशी चलनाचा साठाही काही दिवस पुरेल इतकाच आहे. त्यामुळे पुढे त्याला विदेशातून साहित्य आयात करण्यावरही निर्बंध येणार आहेत. ‘काही मासांपूर्वी श्रीलंकेत जी अराजकाची स्थिती निर्माण झाली होती, तीच स्थिती पाकमध्ये येणार’, असे आता पाकिस्तानी नागरिकच बोलू लागले आहेत. त्याचमुळे शेजारील तालिबान्यांनी म्हटले होते, ‘पाकिस्तान विनामूल्य जरी आम्हाला दिला, तरी आम्ही तो घेणार नाही.’ यातून सर्वकाही स्पष्ट होते. ‘भारताची फाळणी होऊन पाकिस्तान निर्माण करणे, ही चूक होती’, असे पाकिस्तानी आता म्हणू लागले आहेत. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नेतृत्व करावे आणि पाकला सुस्थितीत आणावे’, अशी मागणीही ते करू लागले आहेत. अशी मागणी करणार्यांचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून, तसेच वृत्तवाहिन्यांवरून भारतात मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. आता पाकमधील एक ज्येष्ठ महिला पत्रकार आरजू काझमी यांनी थेट ‘त्यांचे पूर्वज फाळणीच्या वेळी भारतातून पाकिस्तानमध्ये आले, हीच मोठी चूक होती’, अशा प्रकारचे ट्वीट केले आहे. त्या अत्यंत परखड असल्याने त्यांनी उघडपणे असे लिहिले आहे, मात्र काही जण दबक्या आवाजातही हेच बोलत असणार यात शंका नाही.

जसे कर्म तसे फळ !

आता ‘पाकची अशी स्थिती का झाली ?’, याचा विचार केला, तर ‘जसे कर्म तसे फळ मिळते’, हा कर्मसिद्धांतच लक्षात येतो. पाकची निर्मिती ही धर्माच्या आधारे, लक्षावधी हिंदूंची हत्या करून आणि हिंदु महिलांवर बलात्कार करून झाली आहे. या पापाचे फळ कधीतरी तेथील लोकांना भोगावे लागणारच, यात शंका नाही. ‘ती स्थिती आता आली आहे’, असे जर म्हटले, तर ते चुकीचे ठरू नये. ‘भारताने पाकला साहाय्य करावे, ही अपेक्षाही या वेळी चुकीचीच आहे’, असेच वाटते. एका पाकिस्तानी नागरिकाला ‘भारतासमवेत ४ युद्धे झाल्यानंतरही भारताने साहाय्य करावे, असे का वाटते ?’, असे विचारल्यावर त्याने ‘भारत मोठा भाऊ आहे. त्याने सर्व विसरून आम्हाला साहाय्य करावे’, असे तो म्हणाला. ‘पाकला सध्याच्या स्थितीतून केवळ भारतच बाहेर काढू शकतो’, असे काही पाकिस्तानी नागरिकांना वाटत असले, तरी ‘पाकचे सैन्य, शासनकर्ते, जिहादी आतंकवादी, धर्मांध मुसलमान यांना तसे वाटते का ?’, तर याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे; कारण यांपैकी कुणीही उघडपणे असे बोलतांना दिसून आलेला नाही. उघडपणे याविषयी न बोलणे यातून ‘त्यांचा अहंकार किती आहे ?’, हे स्पष्ट होते. ‘भारताला गेली ७५ वर्षे त्रास दिल्यानंतरही आता संकटात भारताने साहाय्य करावे’, अशी जर काही पाकिस्तान्यांची इच्छा असेल, तर ‘भारताने त्यांना का साहाय्य करावे?’, तसेच ‘भारताने काही अटी ठेवल्या, तर ते मान्य करणार आहेत का ?’, असे प्रश्न उपस्थित होतात.

कुत्र्याचे शेपूट वाकडेच रहाणार !

पाकव्याप्त काश्मीरमधील मुसलमानही भारतात येण्याविषयी बोलू लागले आहेत. याचाही विचार करता जर पाक उघडपणे साहाय्याची मागणी करील, तर प्रथम पाकने पाकव्याप्त काश्मीर भारताकडे सोपवला पाहिजे, तसेच भारतात घातपात करणार्या पाकमधील जिहादी आतंकवादी संघटना बंद करून त्यांच्या प्रमुखांना भारताच्या कह्यात दिले पाहिजे; पण हे होणे अशक्य आहे. जनता मेली, तरी चालेल; पण भारताशी म्हणजेच हिंदूंसमोर पाकचे सैन्य अशी शरणागती कदापि पत्करणार नाहीत. त्यामुळे पाकमध्ये येत्या काही मासांत अराजक निर्माण होऊन त्याची ४ शकले झाली, तर कोणतेही आश्चर्य ठरणार नाही. आर्थिक संकटामुळे, प्रचंड महागाईमुळे लोकांना खाण्यासाठी धान्याचे पीठही मिळेनासे झाले आहे. पिठासाठी चेंगराचेंगरी आणि लूटमार होऊ लागली आहे. या घटना वाढत जाऊन शासनकर्त्यांची घरे आणि सैन्याचे तळ यांपर्यंत पोचले, तर नवल ठरणार नाही. हे सर्व पाकमध्ये घडत असतांना, पाकचे काही नागरिक भारताकडे साहाय्याची मागणी करत असतांना भारतातील ‘पाकप्रेमी’ धर्मांध आणि त्यांचे धर्मगुरु, नेते मूग गिळून गप्प बसलेले आहेत. मेहबूबा मुफ्ती, फारूख अब्दुल्ला, ओवैसी यांसारखे नेते याविषयी चकार शब्द काढत नाहीत. मुसलमानांच्या देवबंदसारख्या संघटनाही गप्प आहेत. एकीकडे पाकमधील मुसलमानांची स्थिती भिकार्यांसारखी झाल्याने ते भारतातील हिंदूंकडे साहाय्य मागत आहेत, तर दुसरीकडे भारतातील धर्मांध जे भारताचे खाऊन पाकचे गुणगान करतात, ते हिंदूंना ठार मारत आहेत आणि हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर, मिरवणुकांवर आक्रमण करत आहेत. पाकमध्येही या घटना चालूच आहेत. अशा स्थितीत पाकला साहाय्य करण्याविषयी भारतातील राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदू कधीतरी अनुमोदन देतील का ? उलट ‘अशा स्थितीत पाकवर आक्रमण करून आतापर्यंतचा भारताला दिलेल्या त्रासाचा सूड उगवावा’, अशी प्रतिक्रिया व्यक्त करतील. पाक म्हणजे कुत्र्याचे शेपूट असून ते कदापि सरळ होणार नाही, हे नेहमीच लक्षात ठेवावे लागेल ! अखंड भारताचे स्वप्न जरी हिंदू पहात असले, तरी या स्थितीत ते अशक्य आहे. पाकची खोड जोपर्यंत जिरत नाही, तोपर्यंत पाकची घरवापसीही शक्य होणार नाही, हेही लक्षात घ्यावे लागेल !

पाकची घरवापसी करण्यासाठी पाकचा अहंकार नष्ट होणे आवश्यक !