दुर्बल घटकांवरील रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा झाल्यास ठरणार विधानसभेचा अवमान !

विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर

मुंबई – धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांवर विनामूल्य उपचार करण्यासंबंधी हलगर्जीपणा होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे यापुढे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवरील रुग्णांच्या उपचारांत हलगर्जीपणा झाल्यास तो विधानसभेचा अवमान समजला जाईल, अशी भूमिका विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी अध्यक्षांनी घेतलेल्या भूमिकेविषयी २५ मार्च या दिवशी विधानसभेला अवगत केले.

राज्यात ४०० धर्मादाय रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब रुग्णांवरील उपचारासाठी जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. यामध्ये हलगर्जीपणा झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतली असल्याची माहिती आरोग्यमंत्री सावंत यांनी सभागृहात दिली. आरोग्यविषयी एका लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या वेळी काही आमदारांनी धर्मादाय रुग्णांविषयीच्या तक्रारी सभागृहात मांडल्या. त्याविषयी अध्यक्षांच्या दालनात बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. २१ मार्च या दिवशी ही बैठक झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.

संपादकीय भुमिका

दुर्बल घटकांवरील रुग्णांच्या उपचारांमध्ये हलगर्जीपणा होणे, हे संबंधितांच्या असंवेदनशीलतेची परिसीमा आहे !